पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण याला नेपाळ येथून अटक करण्यात आली असून, या प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
बालगंधर्व रंगमंदिर येथे एका कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली. या प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाणला करण्यात आलेली अटक ही चांगली कारवाई आहे. या प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
हगवणे कुटुंबीयांना शस्त्र परवाने देताना विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप होत आहेत. ते स्वतः हगवणे कुटुंबीयाचे मामा आहेत, याकडे लक्ष वेधता मुख्यमंत्री म्हणाले, ‘अशा प्रकारची तक्रार आली आहे. त्या तक्रारीत किती तथ्य आहे याची चौकशी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाच्या तपासात कोणीही गडबड करू नये. तसेच, तपासावर दबाव आणू नये यासाठी आम्ही काही निर्णय घेतले आहेत. ज्या काही शस्त्र परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्याचा आढावा घेण्यात येईल. कोणत्याही पद्धतीने चुकीची परवानगी दिली गेली असेल, तर ती रद्द केली जाईल.’
लाडकी बहिणीच्या योजनेत लाभ घेणाऱ्या २ हजार ६०० महिला सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या काही महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्या संदर्भातील चौकशी सुरू करण्यात आली आहे.’ ‘निकषांमध्ये न बसताही लाभ घेणाऱ्यांची नावे कमी करण्यात येतील. त्यानुसार यादी करण्याचे काम सुरू झाले असून, ते अद्यापही संपलेले नाही. तसेच, राज्य महिला आयोगाच्या काही जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येईल,’ असेही फडणवीस यांनी सांगितले.