पुणे : गेल्या दशकभरात शहराची कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेण्याची क्षमता ३४ टक्क्यांनी घटली आहे. तसेच पूर रोखण्याची क्षमताही १३ टक्क्यांनी कमी झाली आहे. नैसर्गिक ड्रेनेज यंत्रणेमध्ये तयार झालेले अडथळे, नदीकाठ, पूरक्षेत्रात बेसुमार वाढलेली बांधकामे ही या घट होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. तसेच लँडस्केप्समध्ये बदल करण्यानेही शहराची पुराला बळी पडण्याची शक्यता वाढली असून, पुण्यातील पावसाच्या वाढत्या अनियमितपणामुळे हा धोका आणखी तीव्र झाल्याचा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील डॉ. पंकज कोपर्डे यांनी सस्टेनिया ग्रीन्स एलएलपीच्या प्रतीक्षा चाळके यांच्या सहाय्याने ‘लुजिंग द कार्बन गेम? चेंजिंग फेस ऑफ अ ट्रॉपिकल मेट्रो सिटी अँड रिपर्कशन्स ऑन कार्बन सिक्वेस्ट्रेशन, हिट अँड फ्लड मिटीगेशन कपॅसिटी’ या बाबत केलेल्या अभ्यासाचा शोधनिबंध ‘सस्टेनेबल फ्युचर्स’ या संशोधन पत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. गेल्या दशकभरात पुण्यातील वेगवान शहरीकरणामुळे कार्बन शोषून घेण्याच्या क्षमतेत ३४ टक्के घट झाली आहे.
२०१३ ते २०२२ या कालावधीत शहराचा बांधकाम क्षेत्रात १२ टक्क्यांनी वाढ झाली असून, हरित पट्ट्याचे लक्षणीय नुकसान झाले आहे. परिणामी, कार्बन डायऑक्साइडसारखा प्रमुख हरितगृह वायू शोषून घेण्याची क्षमता घटली आहे. तसेच नैसर्गिक आच्छादन म्हणून काम करणाऱ्या शहरातील टेकड्या, नद्या, पाणथळ जागांचे जतन करणे महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
डॉ. पंकज कोपर्डे म्हणाले, ‘शहरातील टेकड्या, पाणथळ जागा आणि नदीकाठची हिरवळ सुरक्षित ठेवून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने संबंधित धोरणे अमलात आणण्याची गरज आहे. पुण्यासारख्या उष्णकटिबंधीय मेट्रो शहरात स्थानिक जागांना धक्का न लावता सुसंगत काम करण्यातूनच शाश्वत विकास साधता येऊ शकतो. पर्यावरणीयदृष्ट्या समतोल विकासासाठी परिसंस्था सेवा मूल्यांकन प्रारूप (इकोसिस्टिम सर्व्हिस व्हॅल्युएशन्स मॉडेल्स), सर्वसमावेशक शहरी नियोजनाच्या नियमावलीचे अवलंबन करणे गरजेचे आहे.’
पुण्यातील कार्बन शोषून घेण्याचे कमी होत असलेले प्रमाण धोक्याचा इशारा देणारे आहे. तसेच ते देशातील शहरांच्या वेगवान शहरीकरणाविषयी सूचक आहे. शाश्वतता केंद्रस्थानी असायला हवी. शहरी नियोजनामध्ये प्रगतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जाणे महत्त्वाचे आहे. – डॉ. रविकुमार चिटणीस,कुलगुरू, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ