पुणे : राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरीमध्ये राखीव कोट्याअंतर्गत पहिल्याच दिवशी ९ हजार ८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. राखीव कोट्यातून विद्यार्थ्यांना १४ जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी ही माहिती दिली. यंदा पहिल्यांदाच राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीने राबवण्यात येत आहे.

त्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. तसेच, गुरुवारी शून्य फेरीत राखीव कोट्याची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार कोट्यातून प्रवेशासाठी एकूण १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी इनहाऊस कोट्याअंतर्गत अर्ज केलेल्या ५२ हजार ४६८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ८७१, व्यवस्थापन कोट्याअंतर्गत अर्ज केलेल्या ३६ हजार ९९१ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २२, तर अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत अर्ज केलेल्या २३ हजार ५८९ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार १९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याची माहिती देण्यात आली. कोटाअंतर्गत प्रवेश ऐच्छिक असून, कोट्याद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेऱ्यांतून वगळण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.