पुणे : पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा त्रास कमी व्हावा, यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक ती कामे पूर्ण करण्याचे नियोजन पुणे महापालिकेने केले होते. मात्र, शहरातील नाल्यांची सफाई, तसेच पावसाळी गटारांची स्वच्छता अर्धवट आहे. पावसाळापूर्व कामांसाठी २७ कोटी रुपयांचा खर्च केलेला निधी पाण्यात गेला का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

शहरातील विविध भागांतील नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी १५ कोटी रुपयांच्या २३ निविदा, तर पावसाळी गटारे स्वच्छ करण्यासाठी १२ कोटी रुपयांची निविदा, असा २७ कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने केला आहे. मात्र, तरीही महापालिकेची नालेसफाई, चेंबर दुरुस्ती तसेच पावसाळी गटारांची स्वच्छता अद्याप पूर्ण झालेली नाही. शहरात सध्या पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, अनेक भागांतील नाले, ओढे तसेच पावसाळी गटारेही तुंबत आहेत.

दर वर्षीपेक्षा यंदा दहा ते बारा दिवस अगोदरच पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, असे असले, तरी पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी का तुंबले, याचे कोणतेही उत्तर महापालिकेकडे नाही.

पावसाळी चेंबर स्वच्छ करण्याची जबाबदारी असलेले ठेकेदार चेंबर स्वच्छ केल्यानंतर काढलेला कचरा, गाळ तेथेच बाजूला टाकत होते. ही बाब महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली होती. ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, गाळ नक्की कोठे टाकला, याची शहानिशा केल्यानंतरच कामाचे पैसे दिले जातील, तुंबलेली चेंबर पुन्हा स्वच्छ करून घेतली जातील, असे स्पष्टीकरण महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या कोणत्याही अर्जांची वाट न पाहता महपालिकेच्या उद्यान विभागाने तोडाव्यात, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी दहा दिवसांपूर्वीच केली होती. मात्र, झाडपडीच्या, फांद्या पडण्याच्या घटना शहरात सुरूच आहेत.