महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ मे पर्यंतची मुदत दिली होती. पण तरी देखील भोंगे न काढल्याने राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. राज्यभरात बुधवारी पोलिसांनी अनेक ठिकाणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, त्याच दरम्यान मनसेचे पुणे शहाराध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरे हे दोघेही नॉट रिचेबल झाल्याचे समोर आले होते. दोघेही नॉट रिचेबल असल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. अशातच वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत ते तिरुपती बालाजीला असल्याची माहिती दिली आहे.

“पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय, साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार…!”, असं वसंत मोरेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं असून आपण तिरुपती बालाजीला असल्याचं स्पष्ट केलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगेंच्या विरोधात भूमिका जाहीर केल्यानंतर वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पद सोडावे लागले. साईनाथ बाबर यांच्याकडे राज ठाकरे यांनी शहराध्यक्ष पद सोपवलं. या दोघांच्या वॉर्डामध्ये मुस्लीम मतदार अधिक आहेत. राज यांच्या अल्टिमेटमनंतर पुण्यात अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. परंतु यामध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. त्या दोघांचे फोन देखील स्वीच ऑफ होते. हे दोघे नॉट रिचेबल असल्याने नव्या चर्चांना उधाण आले होते.