पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) देशभर पुस्तक महाेत्सव आयाेजित केले जातात. या महोत्सवांना मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये दिल्लीनंतर पुण्याचा क्रमांक लागताे, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी दिली. मोठ्या शहरांनंतर आता ग्रामीण भागांतही महोत्सवाच्या आयोजनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे १३ ते २१ डिसेंबरदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने पत्रकारांशी संवाद साधताना मलिक बोलत होते. पुणे पुस्तक महाेत्सवाचे मुख्य संयाेजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस उपस्थित हाेते.

मलिक म्हणाले, ‘जाॅय ऑफ रीडिंग’ अर्थात वाचनाचा आनंद या संकल्पनेवर पुढील पुस्तक महोत्सव आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाअंतर्गत वाचन संस्कृतीला चालना देणारे उत्तम वृत्तांकन, उत्तम छायाचित्र यांची नाेंद घेऊन विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तीन हजार पुस्तके विनामूल्य डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, फिरत्या पुस्तक बसच्या माध्यमातून आसपासच्या गावांत वाचन संस्कृतीचा प्रचार-प्रसार केला जाणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर पाठाेपाठ नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथेही पुस्तक महाेत्सव आयाेजित केले जाणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला माेठ्या शहरांत, त्यानंतर टप्या-टप्प्याने अगदी गावापर्यंत पुस्तक महाेत्सव घेऊन जायचे आहेत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

पायरेटेड पुस्तके रोखण्यासाठी समिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनात पायरेटेड पुस्तकांची विक्री हाेणार नाही, याचीही दक्षता घेतली जाणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. तसेच, भाषानिहाय मराठी, हिंदी, इंग्रजी असे स्वतंत्र प्रदर्शन भरवण्याचा मानस आहे. पुस्तक प्रदर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत, असेही मलिक यांनी नमूद केले.