ग्रामीण भागातील साखर कारखानदारीच्या माध्यमातून राजकारणावर अंकुश ठेवणारा इरसाल नेता आणि त्या नेत्याच्या आश्रयाला असलेल्या मास्तर या सामान्य माणसाची होणारी उलघाल हा विषय डाॅ. श्रीराम लागू आणि निळू फुले या सशक्त अभिनेत्यांच्या जुगलबंदीचा ‘सामना’ चित्रपटाद्वारे रजतपटावर आला, त्याला ५० वर्षे झाली. त्यातील ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ हा संवाद अजूनही रसिकांच्या मनात रुंजी घालतो. ग्रामीण भागातील राजकीय डावपेच उलगडणारा विषय केंद्रस्थानी असलेला हा मराठी चित्रपट मैलाचा दगड मानला जातो. पन्नाशीची उमर गाठलेली ही अजरामर चित्रकृती पाहण्याची आणि त्याविषयी चर्चेमध्ये सहभागी होण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे.

चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ नंतर डाॅ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाची जुगलबंदी हे ‘सामना’चे खास वैशिष्ट्य ठरले. रामदास फुटाणे यांच्या गिरिराज पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून, डाॅ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शन केले आहे. विजय तेंडुलकर यांची कथा-पटकथा आणि संवाद तर, प्रसंगांची गूढता वाढवून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचविणारे भास्कर चंदावरकर यांचे संगीत, ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये ठरली. रवींद्र साठे यांच्या घनगंभीर आवाजातील ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’, उषा मंगेशकर यांच्या आवाजातील ‘सख्या चला बागामधी रंग खेळू चला’ ही लावणी आणि लता मंगेशकर यांच्या आर्त स्वरांतील ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ या गीतांची मोहिनी रसिकांवर अजूनही आहे. डाॅ. मोहन आगाशे आणि विलास रकटे यांच्या लक्षवेधी भूमिका चित्रपटातील रहस्य वाढविणाऱ्या. तीन राष्ट्रीय पुरस्कार, सात राज्य पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या ‘सामना’चे महत्त्व खचितच अधिक.

‘सामना’ चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त २ जून रोजी या चित्रपटाविषयी विशेष कार्यक्रमाने ‘कोहिनूर कट्टा’ या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. कोहिनूर ग्रुप, आशय फिल्म क्लब आणि साहित्य कला गौरव यांच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ‘वाळवी’ चित्रपटास प्रदान करण्यात येणारा ‘साहित्य कला गौरव सामना सन्मान’ मधुगंधा कुलकर्णी स्वीकारणार आहेत. चित्रपटसृष्टीला ‘सामना’ने दिलेले योगदान या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विलास रकटे, निर्माते रामदास फुटाणे यांच्याशी दिलीप ठाकूर संवाद साधणार आहेत.

‘सत्यशोधक समाजवादी’

प्रतिकूलतेवर मात करून घेतलेले वैद्यकीय शिक्षण, हडपसर येथे वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून गरजूंवर केलेले मोफत उपचार, राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून झालेले सत्यशोधक समाजवादी संस्कार, पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी केलेली ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ, असंघटित कामगारांना संघटित करण्याच्या उद्देशातून स्थापन केलेली हमाल पंचायत, गोरगरीब कष्टकऱ्यांना रास्त दरामध्ये भोजन देणारी ‘कष्टाची भाकर’, रिक्षाचालकांसह अंगमेहनती कष्टकऱ्यांना संघटित करण्यासाठी कार्यरत, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या धरण व प्रकल्पग्रस्त पुनर्वसन परिषदेचे संस्थापक अशा विविधांगांनी सामाजिक कार्यामध्ये गेल्या ७५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत डाॅ. बाबा आढाव यांचा जीवनप्रवास ‘सत्यशोधक समाजवादी’ या माहितीपटातून उलगडला आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव १ जून रोजी ९६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. हे औचित्य साधून ३० मे रोजी दस्तुरखुद्द डाॅ. बाबा आढाव या चरित्र नायकाच्या उपस्थितीत हा माहितीपट पाहण्याची संधी लाभणार आहे. समविचारी संघटनांच्या सहकार्याने एस. एम. जोशी फाउंडेशन येथे सायंकाळी पाच वाजता ‘लोकशाही समाजवादासमोरील आव्हाने आणि पुढील दिशा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात सुभाष वारे, संजय आवटे, अश्विनी सातव-डोके आणि डाॅ. शमसुद्दीन तांबोळी सहभागी होत असून, डाॅ. बाबा आढाव अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vidyadhar.kulkarni@expressindia.com