श्रीराम पुजारी हे मूळ मंगरुळकडचे, कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील. वडील भिक्षुकीवर कुटुंबाचा चरितार्थ चालवणारे! त्यामुळे वार लावून पाेटात दोन घास ढकलत, रस्ते झाडत, तर कधी मर्तिकासाठी लागणारे सामान विकत पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गोऱ्या-घाऱ्या, सधन मुलांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत कृष्णवर्णीय रामभाऊ जिद्दीने शिकले. स्मशानातील कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात ग्रंथांच्या सहवासात रमले. साेलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेत मराठीचे शिक्षक आणि त्यानंतर तेथेच संगमेश्वर महाविद्यालयात शिकवू लागले. सुहासिनी हे नाव सार्थ करणाऱ्या गृहिणीबराेबर त्यांनी संसार मांडला. मध्यमवर्गीय असूनही पुजारींनी प्रत्येकाला काही ना काही देऊनच परत पाठवले किंवा आग्रहाने ठेवून घेतले. १९५०च्या दशकापासून महाराष्ट्राच्या नकाशावर सोलापूरचे नाव झळकू लागले ते केवळ तेथील सूतगिरण्या व शेंगदाण्याच्या चटणीमुळे नव्हे, तर श्रीराम पुजारी या रसिकाग्रणीमुळे.

स्वत: पुजारी कोणी साहित्यिक किंवा कलाकार नव्हते. तरी त्यांच्याशी असलेल्या स्नेहबंधामुळे देवाघरचे लेणे असलेले किती तरी नामवंत सोलापूरला आवर्जून जाऊन गाणे ऐकवून, नृत्य सादर करून आणि कवितांचे अभिवाचन करून आले. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, सेनापती बापट, न्यायमूर्ती तारकुंडे, न्या. उमेश लळित, अमीर खाँ, बिस्मिल्ला खाँ, बेगम अख्तर, पं. भीमसेन जाेशी, पं. कुमार गंधर्व, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, गंगुबाई हनगल, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त महाकवी द. रा. बेंद्रे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, त्र्यं. वि. सरदेशमुख, डाॅ. य. दि. फडके, प्रा. ग. प्र. प्रधान, माधव मोहोळकर, अच्युत गोडबोले, किशोर भिंगारे, प्रकाश साठ्ये यांच्यासारख्या शेकडो लोकांशी पुजारी जोडले गेलेले होते. किती तरी काव्यपंक्ती, गद्य साहित्यातील अवतरणे आणि बंदिशी, रागांचे चलन त्यांना मुखोद्गत होते. पु. ल. देशपांडे म्हणजे तर पुजारींच्या मर्मबंधातली ठेवच होती.

सार्वजनिक कामे उभी करताना, कल्याणकारी योजना प्रत्यक्षात उतरवताना आणि सांस्कृतिक उपक्रमांची आखणी करतानाही त्यांना कधी पैसे अपुरे पडले नाहीत किंवा ते कधी त्यासाठी आवाहन करायला कचरले नाहीत. त्यामुळेच सोलापुरातील हिराचंद नेमचंद ग्रंथालयाची इमारत दिमाखाने उभी आहे. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानाने दिलेल्या पाठबळामुळे अभावग्रस्त परिस्थितीतील असंख्य गरीब, गरजू व अनाथ विद्यार्थी आपापल्या क्षेत्रांत खंबीरपणे पाय रोवून स्वावलंबीच नव्हे, तर या प्रतिष्ठानाचा आधारही झाले. एकलव्य हे स्वतः घेतलेले नाव पुजारींनी सार्थ केले.

संगीताच्या क्षेत्रात, आपली थोरामोठ्यांशी कशी सलगी आहे, दुर्मीळ बंदिशींचे धन आपल्याच हाती कसे लागले आहे आणि हा ठेवा आपलीच कशी मक्तेदारी आहे, हे रंगवून सांगण्यात अनेकांना धन्यता वाटते. रामभाऊंनी याला पूर्णत: छेद दिला. किंबहुना आपल्यासमवेत जे येतील, त्यांना कोणत्याही वाहनाने प्रवास करून ते त्या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार करून घेत. मग ते पुलंचे व्याख्यान, बिरजू महाराजांचे नृत्य, द. शं. सोमणांसारख्या पोलीस महासंचालकाचा पदग्रहण समारंभ, किशोरी आमोणकर, वसंतराव देशपांडे, पं. जसराज यांच्यापैकी कोणाचेही गाणे असो किंवा राज कपूरचा ‘संगम’सारखा त्या काळात गाजलेला चित्रपट असो; आपल्या गोतावळ्यासकट रामभाऊ त्या ठिकाणी जात. याखेरीज कोणाचे आजारपण, कोणाची साठी, लग्न किंवा देदीप्यमान कामगिरीचे कौतुक करण्यासाठीही पदरमोड करून ते उपस्थित राहत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काटकसरीच्या संसारात पत्नीच्या समंजसपणाने सारे काही सुरळीत झाले. जागा अपुरी असताना जब्बार पटेल या मुलाला त्यांनी घरी ठेवून घेतले. कोणीही सोलापुरात गेला, तर त्यांच्याकडेच बैठक जमत असे. कदाचित म्हणूनच त्यांची पन्नाशी, साठी व पंचाहत्तरी खच्चून भरलेल्या सभागृहात साजरी झाली आणि त्यांच्या मृत्यूपश्चात अरुण टिकेकर संपादित ‘मुक्तानंद’ हा स्मृतिग्रंथही प्रकाशित झाला. कुमारजींचे गाणे ऐकण्यासाठी परीक्षेला न बसणारे, राम गणेश गडकरींसारखी एक तरी कल्पना तुम्ही करून दाखवा, असे मराठीच्या प्राध्यापकाला सुनावणारे आणि मुलीला, ‘तू तुझ्यासारखी हो’ असे स्पष्टपणे सांगणारे निर्मळ आणि निरपेक्ष वृत्तीचे पुलंच्या भाषेत रसिकाग्रणी राम पुजारी. प्रतिभारत्न-प्रज्ञावंतांची अभिव्यक्तीसुद्धा समाजात अल्पजीवी ठरण्याचा काळ आता आला आहे. अशा वेळेस राम पुजारींचे नाव उच्चारताच, किती तरी जणांना आजही ते, त्यांचे अभिप्राय जसेच्या तसे आठवतात. अभिजात रसिकतेचा याहून मोठा गौरव तो कोणता! रेखा इनामदार-साने