पुणे : किरकोळ वादातून एकावर चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. खून करून पसार झालेल्या आरोपीविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.राजू दादू आरू (वय ४२, रा. गोंदवले नाका, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिल अशोक जाधव (वय ३८, सध्या रा. गायकवाड बिल्डिंग, नऱ्हे, मूळ रा. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी सांगिले.आरोपी अनिल हा चालक म्हणून नाेकरी करतो. राजू हा उपाहारगृहात कामाला होता. अनिल आणि राजू हे मित्र आहेत. मंगळवारी तो अनिलला भेटायला आला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. अनिलने राजूच्या डाेक्यात लोखंडी बादली घातली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अनिल आणि राजू यांच्यात झालेल्या वादामागचे कारण समजू शकले नाही.