पुणे : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ बाजार समितीतून मार्केट यार्डातील फळ व्यापाऱ्याने ई-नामद्वारे सफरचंद आणि पिअरची खरेदी केली. ‘ई-नाम इंटरस्टेट ट्रेड’अंतर्गत दोन राज्यांतील बाजार समित्यांमध्ये ई-लिलावाद्वारे शेतीमालाची खरेदी-विक्री करता येत आहे. त्यामुळे आंतरराज्य शेतीमाल खरेदी-विक्रीला चालना मिळणार आहे.
जम्मू-काश्मीर येथील शोपियाँ बाजार समितीमधून ई-नामद्वारे येथील मार्केट यार्डातील सफरचंद व्यापारी सुयोग सूर्यकांत झेंडे यांनी सफरचंद आणि पिअर या फळांची नुकतीच खरेदी केली. त्यांनी एकूण ११ टन ६०० किलो सफरचंद आणि पिअर खरेदी केली असून, या खरेदीची किंमत ११.७६ लाख रुपये असल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाकडून देण्यात आली.
जम्मू-काश्मीर येथील सफरचंद, पिअर आणि प्लम अशा फळांची ‘ई-नाम’मार्फत खरेदी करण्यात येते. ऑनलाइन पद्धतीने खरेदी-विक्री केल्यास खरेदीदार, तसेच शेतकऱ्यांना फायदा होतो. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी पुढाकार घेऊन खरेदी-विक्रीस चालना दिली आहे. ई-नाममुळे जम्मू-काश्मीर येथील बाजार समिती आणि पुणे बाजार समितीत सफरचंद, पिअर, प्लम अशा फळांच्या खरेदीची व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. जम्मू-काश्मीरप्रमाणे अन्य राज्यांतील शेतीमालाच्या ‘ई-नाम’द्वारे खरेदी-विक्रीबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी दिली.
२१ हजार ५८२ कोटींची उलाढाल
केंद्र शासनाने शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी ‘देशपातळीवर एक बाजार’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) ही योजना सुरू केली. महाराष्ट्रासह २३ राज्यांतील, तसेच चार केंद्रशासित प्रदेशातील मिळून १५२२ बाजार समित्या ‘ई-नाम’ला जोडल्या गेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १३३ बाजार समित्या आहेत. राज्यात ‘ई-नाम’द्वारे एकूण ५७८ लाख क्विंटल शेतीमालाची विक्री झाली असून, विक्री झालेल्या मालाची किंमत २१ हजार ५८२ कोटी रुपये आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची ‘ई-नाम’द्वारे होणारी विक्रीची रक्कम अडत्यांमार्फत थेट ई-पेमेंटद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतीमालाच्या ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ‘ई-नाम’मुळे व्यापारवाढीस चालना मिळाली आहे. ई-लिलावाद्वारे सोयाबीन, हरभरा, मका, गहू, ज्वारी, हळद, तूर, उडीद, कांदा, डाळिंब, कोबी, रेशीमकोष आणि फळांची विक्री होत आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आंतरराज्य व्यापारामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. – संजय कदम,कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ