केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पाकिस्तान विषयावर भाष्य केलंय. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात द्यावं, नाही तर पाकशी एकदा आरपारची लढाई करायला लागेल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिलाय. तसेच आता पाकिस्तानचे फार लाड करून चालणार नाही, असं मतंही व्यक्त केलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “जम्मू काश्मीरमधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा डाव आहे. अनेकजण उद्योग-व्यवसाय करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये येत असतात. त्यांना दहशतवादी मारत आहेत. पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायला लागेल. पाकिस्तानने हल्ले थांबवले पाहिजेत. त्यांना विकास करायचा असेल, तर दहशतवादी कारवाई थांबवून पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात द्यायला हवा. नाही तर एकदा पाकशी आरपारची लढाई करायला लागेल. पाकिस्ताचे फार लाड करून चालणार नाही.”

“जय शहा यांना पाकिस्तानशी खेळू नये असं सांगणार”

“भारत पाकिस्तान मॅच होऊ नये असं माझं मत आहे. पाकिस्तान बरोबर खेळू नये. पाकिस्तान अनेक हल्ले करत आहेत. मी जय शहा यांना पाकिस्तानशी खेळू नये असं सांगेन. खेळामध्ये राजकारण आणू नये हे खरं आहे, पण अशा परिस्थितीत खेळू नये,” असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

“सरकार अस्थिर करायचं असतं तर…”

रामदास आठवले म्हणाले, “सरकार अस्थिर करण्याची आम्हाला गरज नाही. सर्व यंत्रणा देशाच्या ताब्यात असल्या, तरी मोदी सरकार अशा सूचना देत नाही. सरकार अस्थिर करायचं असतं तर एक वर्षांपूर्वी केलं असतं. पवार साहेबाचा आदर असून त्यांच्या मताशी मी सहमत नाही. केंद्र सरकार धाडी टाकायला लावत नाही.”

“आरपीआयला पुण्यात महापौर पद आणि मुंबईत महापौर पद मिळावं”

“राज्यातील महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपासोबत राहणार आहे. पुण्यात महापौर पद मिळालं पाहिजे. तसेच मुंबईमध्ये उपमहापौर मिळाले पाहिजे. पुण्यात 15 ते 20, तर मुबंईमध्ये 30 ते 35 जागा मिळाल्या पाहिजेत,” अशी मागणी आठवले यांनी केली.

हेही वाचा : “…तर शिवसेनेचं मोठ नुकसान” रामदास आठवलेंच भाकित

“भाजपाला आरपीआय असताना मनसेची गरज नाही, मनसेमुळे नुकसान होऊ शकतं”

“भाजपाला आरपीआय असताना मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपाचं नुकसान होऊ शकतं. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. आम्ही भाजपाचा नाद सोडला, तर ते आमचा नाद सोडणार नाही,” असा सूचक इशारा रामदास आठवले यांनी भाजपाला दिलाय.