केंद्र शासनाच्या वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडे (डब्ल्यूडीआरए) १७४ वखार केंद्रांची सर्वाधिक नोंदणी करण्यात आली आहे. वखार केंद्राची नोंदणी करण्यात देशात महाराष्ट्र अव्वल ठरले आहे. केंद्र सरकारच्या वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाचा बारावा वर्धापन दिन नवी दिल्लीत नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राधिकरणाचे संचालक मुकेशकुमार जैन यांच्या हस्ते वखार महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज कुमार, सहसचिव धीरज साहू, केंद्रीय वखार महामंडळाचे अध्यक्ष अरुण कुमार श्रीवास्तव, राज्य वखार महामंडळाचे संचालक अनुज कुमार, महामंडळाचे सरव्यवस्थापक अविनाश पांडे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा >>>रुपी अवसायनात ; अवसायक म्हणून धनंजय डोईफोडे यांची नियुक्ती

देशात १८ राज्यांमध्ये वखार महामंडळ कार्यरत आहेत. ‘डब्ल्यूडीआरए’कडून शेतीमाल तारण कर्जासाठी गोदामांची नोंदणी अनिवार्य केली आहे. निकषांची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने १७४ वखार केंद्राची नोंदणी केली आहे. यात ८२२ गोदामांचा समावेश असून त्यांची साठवणूक क्षमता १५ लाख ५३ हजार टनएवढी आहे. नोंदणीकृत गोदाम म्हणजे शेतीमाल शास्त्रशुध्द पध्दतीने साठवणूक करण्यासाठी गोदाम उपयुक्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे. ई-वखार पावतीवर ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, अशी माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा >>>पुणे : अनैतिक संबंधातून पतीचा खून ; पत्नीसह चौघे गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतीमाल साठवणुकीचे प्रमाण वाढते
वखार महामंडळांच्या गोदामांमध्ये सोयाबीन, हळद, हरभरा, भातासारख्या शेतीमालाच्या साठवणुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल साठवणुकीच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. शेतीमाल उत्पादक कंपन्यांना सवलत देण्यात आली आहे. ‘डब्ल्यूडीआरए’अंतर्गत नोंदणी झाल्याने गोदामात साठवणूक करण्यात आलेल्या शेतीमालावर राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजदर असलेल्या बँकांकडून शेतीमाल तारण कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे, असे वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे यांनी नमूद केले.