पुणे : धर्म आणि मूल्यांवर आधारित समता आणि शोषणमुक्त समाजाचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनकार्यातून घालून दिला. देशाच्या एकात्मतेसोबत समता, स्वातंत्र्याची सांगड कशी घातली गेली पाहिजे, याचे मौलिक मार्गदर्शन राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी केले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस विद्यापीठ परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणाभूमी या स्मारकाला मोहन भागवत यांनी भेट दिली. स्मारकाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार आणि  विद्या येरवडेकर यांनी त्यांना स्मारकाविषयी  विस्तृत माहिती दिली. त्यानंतर आयोजित छोटेखानी सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह सचिन भोसले,  सामाजिक कार्यकर्ते के. डी. जोशी, काश्यपदादा साळुंखे, किशोर खरात, वेणू साबळे, क्षितिज गायकवाड, संघर्ष गवाले, विजय कांबळे, शरद शिंदे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : बजाजची सीएनजी दुचाकी रस्त्यावर कधी येणार? राजीव बजाज यांनीच दिलं उत्तर

या स्मारकाची वास्तू आणि त्यातील ठेवा मुजुमदार कुटुंबियांनी सुंदररित्या जपला आणि मांडला आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी उभारेलले हे स्मारक डॉ. आंबेडकर यांच्या असंख्य आठवणींना उजाळा देणारे आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी या स्मारकाटे दर्शन घेऊन त्यातून प्रेरणा घ्यायला हवी, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

हेही वाचा : दूध आणि पोषण आहार पुरवठ्यात कोट्यवधींचा घोटाळा; आमदार रोहित पवार यांचा आरोप

स्मारक उभारणीच्या आठवणींना उजाला देत डॉ. मुजुमदार म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चारित्र्यवान नागरिक घडवते. आपल्या उच्च शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी शिक्षित होतात. मात्र, सुसंस्कृत होत नाहीत. सुसंस्कृत, चारित्र्यवान विद्यार्थी आमि नागरिक घडावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उच्च शिक्षण क्षेत्रात काम करावे.