पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. वाहतुकीच्या समस्येवर सातत्याने टीकेची झोड उठवली जाते. वाहतुकीचा प्रश्न असो वा शहरातील कचऱ्याची समस्या, या समस्यांबाबत आपणच काही तरी केले पाहिजे या जाणिवेतून ‘समर्पण’ नावाच्या युवक समूहाने कोणताही गाजावाजा न करता नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आगळे कार्य सुरू केले आहे.
शहराच्या मध्य भागात तसेच उपनगरात ‘समर्पण’ समूहातील युवक-युवती वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी हातात फलक घेऊन उभे राहतात. जेथे वाहतूक कोंडी झाली असेल तेथील कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या युवकांच्या या समूहाने प्रत्यक्ष कृती करण्यावर भर दिला असून टीका करण्यापेक्षा आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने युवकांच्या या समूहाकडून कार्य सुरू आहे.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर करीअर करतानाच आपण समाजासाठीही काही तरी करूया या भावनेतून महाविद्यालयीन युवकांच्या या समूहाने दीड वर्षांपूर्वी ‘समर्पण’ या समूहाच्या माध्यमातून कार्य सुरू केले. अपूर्वा वाणी ही या समूहाची अध्यक्ष आहे. तन्मय ब्रम्हे, सुशारद पुशिंग, डॉ. अमित वाडकर, धनंजय बराटे हे सक्रिय सदस्य आहेत.
‘समर्पण’चे कार्य कसे सुरू झाले याची माहिती देताना तन्मय ब्रम्हे म्हणाला, पुण्यातील वाहतूक आणि कचरा प्रश्नावर सातत्याने टीका केली जाते. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून दोन वर्षांपूर्वी आम्ही सर्वजण एकत्र आलो. या समस्या सोडविण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी आपण देखील खारीचा वाटा उचलू शकतो, या विचारातून आम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागात ‘थिंक बिफोर यू थ्रो’ ही जनजागृतीपर मोहीम सुरू केली. रस्त्यावर कचरा टाकू नका, कचरापेटीत कचरा टाका, असे आवाहन करणारे फलक घेऊन आम्ही काम सुरू केले. आपण रस्त्याने काही खात निघालो तर राहिलेले पदार्थ वा वेष्टने रस्त्यावर टाकून पुढे निघून जातो. असा अगदी किरकोळ स्वरूपाचा कचरा अस्वच्छतेत भर घालतो. यासाठी आम्ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
‘समर्पण’चे कार्य सध्या समूहाच्या स्वरूपात सुरू आहे. ‘समर्पण’च्या माध्यमातून संस्थात्मक पातळीवरही लवकरच काम सुरू होणार आहे. गेल्या वर्षभरापासून या समूहातील युवक-युवती शहराच्या गजबजलेल्या चौकात तसेच रस्त्यांवर वाहतुकीच्या नियमांबाबत जागृतीचा उपक्रम करत आहेत. लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगावातही त्यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महिला सबलीकरण तसेच व्यवसाय रोजगाराच्या संधीविषयी लोहगावात मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
‘समर्पण’च्या विविध उपक्रमांसाठी लागणारा निधी आम्ही स्वत: जमवितो. त्यासाठी कोणाकडून देणगी घेत नाही. सध्या आमच्या समूहात साठ युवक-युवती आहेत. महाविद्यालयात झालेल्या ओळखीतून आणखी काहीजण जोडले गेले आहेत. व्हॉटसअॅप समूह तसेच फेसबुकच्या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहतो, असेही तन्मय ब्रम्हे याने सांगितले.