पुणे: लोकसभा, विधानसभा ही नेत्यांची निवडणूक असते, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसैनिकांच्या असतात. शिवसैनिक पक्षासाठी सातत्याने राबत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतभेद बाजूला ठेवून पक्ष संधी देईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते, माजी खासदार आनंद आडसूळ यांनी केले.

शिवसेना नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारातून जिल्हा पदाधिकऱ्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आडसूळ बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दृक-श्राव्य प्रणालीद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला.

आडसूळ म्हणाले, ‘लोकसभा, विधानसभा ही नेत्यांची निवडणूक असते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसैनिकांच्या असतील. शिवसैनिक पक्षासाठी सातत्याने राबत असतो. त्यामुळे त्याला महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी या निवडणुकांतून मिळणार आहे. एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असतात. मात्र, अशा वेळी मतभेद बाजूला ठेवून पक्ष ज्याला संधी देईल, त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.’

‘तीन वर्षांपूर्वी निष्क्रिय लोकांपासून पक्षाला आणि काम करणाऱ्या नेतृत्वाला न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यामुळे पक्ष वाचला आणि नेते, निष्ठावंत शिवसैनिक यांना नवी ऊर्जा आणि ताकद मिळाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला असून, पक्षाला वाहून घेतलेला शिवसैनिक आज सत्तेमध्ये बसला आहे.’ असे आडसूळ म्हणाले.‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांना मंत्री, खासदार, आमदार केल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवसेनाप्रमुखांचा हाच वारसा एकनाथ शिंदे चालवित आहेत.’ असे सांगत आडसूळ यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या,‘महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गट आणि गणनिहाय बांधणी करावी. युती झाली तर आनंद आहे. मात्र, नाही झाली तर मोठ्या संख्येने जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी जोमाने काम करावे.’