पुणे : ‘कोणतेही हिताचे बदल करताना नाराजी असते. मात्र, समाजाचे हित लक्षात घेऊन नाराजी घेण्याची ताकद ठेवावी लागते. ती भूमिका घेतल्याने महिलांसंदर्भात काही कायदे झाले. याचा अर्थ सर्व प्रश्न सुटले असा होता नाही. आजही अनेक अडचणी आहेत. कायद्यामध्ये दुरुस्ती होत आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलली आहे, असे सांगता येणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे रविवारी सांगितले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्कारांचे वितरण रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले. त्या वेळी पवार बोलत होते. सेंटरच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, धैर्यकन्या आसावरी जगदाळे या वेळी उपस्थित होते. मनीषा सजनपवार, डॉ. श्यामल गरुड, कमल कुंभार, उल्का महाजन, डॉ. शबनम शेख, अलका धुपकर यांना कृषी, साहित्य, उद्योजिका, सामाजिक, क्रीडा, पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
‘महिलांसदंर्भातील देशातील पहिले धोरण राज्याने केले. त्यावेळी राज्याची सूत्रे माझ्या हाती होती. अनेकांशी संवाद साधून धोरणाचा कच्चा आराखडा करण्यात आला. त्या धोरणाचे स्वागत झाले. मात्र, निर्णय घेताना अनेक वेळा कुठे ना कुठेतरी विरोध होत होता. लोकांची मानसिकता बदलायची आवश्यकता होती. समाजातील पुरूष वर्गाची ती मानसिकता त्या काळात बदलली नव्हती. अलीकडेही दैनंदिन जीवनामध्ये हीच मानसिकता पाहायला मिळते,’ असे पवार यांनी सांगितले.
‘वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना हिस्सा देण्यासंदर्भातील ठरावही काहींना आवडला, तर काहींना तो आवडला नव्हता. या ठरावाचे कायद्यात रूपांतर करताना सगळ्यांना समजावून त्याबाबतचा कायदा मंजूर केला. महिलांना अधिकार देण्याचा निर्णय देशात प्रथम महाराष्ट्रात घेतला गेला. त्या वेळी आपण नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था या सगळ्या ठिकाणी महिलांना अधिकार दिला. समाजाचे हित असेल तर ती नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.
हुंडाबळीसारख्या घटना दुर्दैवी- सुप्रिया सुळे
‘एकीकडे नवीन तंत्रज्ञानाला अनुसरून बदल करत असताना, पुण्यासारख्या शहरात हुंडाबळीसारखी घटना घडणे दुर्दैवी आहे. आज हुंड्यावर भाषण करावे लागत आहे, हे खूप वेदनादायी आहे. समाज म्हणून हे आपले अपयश आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक परिवर्तन झाले आहे का? त्यामुळे सरकारने महिलांना स्वत:च्या पायावर उभे कसे करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,’ असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.