लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कांद्यावरील निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने जगातील बाजारपेठा शेतकऱ्यांसाठी बंद केल्या आहेत. याला विकास म्हणत नाहीत, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर रविवारी टीका केली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शुल्कामध्ये ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक, पुण्यातील मंचर, अहमदनगर येथे आंदोलने झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.

आणखी वाचा-“त्यांना उत्तर द्यायचं ते…”, शरद पवारांच्या टीकेला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

कांदा उत्पादकांच्या संसारात हात घालण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. कांदा निर्यात शुल्क वाढवून कांद्याचे भाव पाडण्यात आले आहेत. कांदा निर्यात शुल्कात वाढ केल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठा बंद झाल्या आहेत. या सर्व प्रकाराला विकास म्हणता येणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले की, महागाई, बेरोजगार वाढती गुन्हेगारी शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किंमतीचा प्रश्न, उद्योगधंद्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न राज्यसमोर आहेत. राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत. गेल्या सहा महिन्यात राज्यातील किती कारखाने, उद्योग गुजरात किंवा अन्य राज्यात गेले, याची माहिती पुढे आली पाहिजे. अन्य राज्यांमध्ये कारखाने, उद्योग जाण्यास विरोध नाही. मात्र महाराष्ट्रात येणारे उद्योग दुसरीकडे गेल्याने बेरोजगारी वाढली आहे. स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी हुकल्या आहेत. त्यामुळे आता या प्रश्नांबाबत बोलावे लागेल. राज्यातील सरकार हिताचे निर्णय घेत नाही.