पुणे : ‘देशात अनेक कर्तृत्ववान राजे झाले. मात्र, त्यांचे राज्य कुटुंबापुरते मर्यादित होते. मात्र, शिवछत्रपतींच्या राज्याला कोणी भोसल्यांचे राज्य असे म्हटले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य चालविले आणि आदर्श निर्माण केला,’ असे गौरवोद्वगार ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे काढले. शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि शिवस्पर्श प्रकाशन यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवपुत्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांना ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ आणि माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष चेतना गाला-सिन्हा यांना ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ॲड. शैलजा मोळक लिखित ‘जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी भाग २’ आणि रझिया सुलताना लिखित ‘ताराबाई शिदेंच्या निबंधातील सामाजिक वास्तव’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. शिवस्पर्श दत्तक योजनेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
आमदार बापू पठारे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रतिष्ठानचे विश्वस्त राजाभाऊ चोपदार, अध्यक्ष ॲड शैलजा मोळक, ज्ञानेश्वर मोळक आणि ज्ञानेश मोळक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक बाबा भांड होते. पवार म्हणाले, ‘मराठी लोकांची राज्ये लक्षात राहतील, अशीच होती. बडोदा आणि ग्वालियर ही त्याची उदाहरणे देता येतील. राज्य कोणासाठी आणि कसे चालवायचे, याचा आदर्श त्यांनी घालून दिला होता. शेती, शिक्षण, उपेक्षितांना सन्मानाने जगण्याची संधी राज्यकारभार करताना या राज्यांनी दिली. देशात अनेक राजांची राज्ये झाली. मात्र, त्यांची राज्य कुटुंबीयांपुरती सीमित राहिली. निजाम आणि मोगल ही त्याची उदाहरणे देता येतील. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य चालविले आणि आदर्श निर्माण केला. त्यामुळे त्यांच्या राज्याला कोणी भोसल्यांचे राज्य असे म्हटत नाही.’
चेतना गाला-सिन्हा यांच्या कार्याचा गौरव करताना पवार यांनी माणदेशातील आठवणींना उजाळा दिला. ‘दुष्काळ हा माणदेशाला लागलेला रोग असला, तरी माणदेशाचा माणूस कधीही मागे राहिला नाही, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, जयप्रकाश नारायण यांच्यामुळे ग्रामीण भागात काम सुरू केले. माणदेशात महिलांना दगड फोडताना पाहून मी हादरून गेले. तेव्हा मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि म्हसवडला आले. पती विजय सिन्हा यांच्या सोबतीने ग्रामीण भागात काम सुरू केले. माणदेशी महिला बँक सुरू झाली. ताराराणींनी तलवारीतून विरोधक संपवले. आमच्या महिलांकडे तलवार नाही; पण ताकद आहे, अशी भावना चेतना गाला-सिन्हा यांनी व्यक्त केली. तर, शिवरायांचे अंतिम उद्दिष्ट युद्ध नव्हते. त्यांना शांतता निर्माण करायची होती. त्याच भूमिकेतून त्यांनी लोकशाहीसाठी भूमी तयार केली. महिलांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांनी ज्ञानाला महत्त्व दिल्याचे डाॅ. प्रकाश पवार यांनी सांगितले.