पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी रविवारी काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेला पावसाच्या सरी झेलून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक येथून निघालेल्या यात्रेची ज्ञानेश्वर पादुका चौकात सभेने सांगता झाली.

हातात तिरंगा घेऊन, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘दहशतवाद मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, समाजकल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त वसंत गोखले, मनोज एरंडे, शरद केळकर, अर्जुन पुरस्कारप्राप्त रेखा भिडे-मुंडफन आणि मनोज पिंगळे हे क्रीडापटू, माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले, संदीप खर्डेकर, सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, सुभाष जंगले, राहुल भंडारे, प्रमोद कोंढरे, वर्षा तापकीर, गणेश कळमकर, रवींद्र साळेगावकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.