करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्य मंडळाकडून सुधारित वेळापत्रक पुढील काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. मात्र परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नियमित आणि पुरवणी परीक्षेसह अतिरिक्त संधी देण्यासाठीची विशेष परीक्षा आता घेता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. शैक्षणिक वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी दरवर्षीप्रमाणेच नियमित आणि पुरवणी परीक्षा याच दोन परीक्षा घेतल्या जातील. राज्य मंडळातर्फे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. राज्य मंडळाने जाहीर के लेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार होती. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर के ला होता. करोना काळात परीक्षा होणार असल्याने कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी नियमित परीक्षेनंतर आणि पुरवणी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष परीक्षा घेण्याचे राज्य मंडळाने ठरवले होते. मात्र आता परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षेसाठी उपलब्ध असलेला वेळ कमी झाला आहे. परिणामी अतिरिक्त संधी देणारी विशेष परीक्षा राज्य मंडळाला घेता येणार नाही. पुढील शैक्षणिक वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी परीक्षेच्या दोनच संधी उपलब्ध होतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक राज्य मंडळाकडून पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेची संधी मिळण्यासाठी नियमित आणि पुरवणी परीक्षेव्यतिरिक्त विशेष परीक्षा घेण्याचे नियोजन होते. दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विशेष परीक्षा घेता येणार नाही. विशेष परीक्षा घेतल्यास पुढील शैक्षणिक वेळापत्रक बिघडेल. - दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य मंडळ