पिंपरी : केंद्र सरकार कामगार विरोधी आहे. कामगार हिताच्या कायद्याची मोडतोड केली जात आहे. कायदे मालकधार्जिणे केले जात आहेत. कामगार हा शब्दच कायमचा नष्ट होणार आहे. कामगारांचा संप करण्याचा अधिकारदेखील काढून घेण्यात आल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केला. मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ रविवारी (५ मे) कामगार मेळावा पार पडला. आमदार सचिन अहिर, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम, सीआयटीयूचे पुणे जिल्हाध्यक्ष कॉ. अजित अभ्यंकर, अखिल भारतीय कामगार सेनेचे डॉ. रघुनाथ कुचिक, किरण मोघे, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकळे यावेळी उपस्थित होते. हेही वाचा >>> मावळमध्ये उद्यापासून प्रचाराचा धडाका… कोणत्या नेत्यांच्या सभा होणार? लोकसभेची निवडणूक सर्वांच्या जीवनाशी संबंधित आहे. कामगारांच्या प्रश्नांबाबत, वाढत्या बेरोजगारीबाबत चर्चा होत नाही. सरकारी पदांची भरती केली जात नाही. नोकऱ्यांचे खासगीकरण सुरू आहे. राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. त्यावर कोणी काही बोलत नसल्याचे आमदार अहिर म्हणाले. कैलास कदम म्हणाले, की कामगार कायद्यांची मोडतोड केली जात आहे. कायम कामगार हा शब्द कायमचाच नष्ट होणार आहे. केंद्रातील भाजप सरकारने कामगार क्षेत्रावर घाव घातला आहे. त्या सरकारला उलथवून टाकायचे असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहावे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे. शेतकरी, कामगार आणि सर्व जाती धर्माचा घटक एकत्र आलेला आहे. इंटकच्या माध्यमातून आम्ही राज्यभर फिरून कामगारांना आश्वासित करत आहोत. निवडणूक आपल्या अस्मितेची आहे. कामगारांची, शेतकऱ्यांची प्रगती झाली का, नवीन उद्योगधंदे आले का, जे आहेत ते उद्योगधंदे टिकलेत का, कामगार काय करू शकतो, हे यापूर्वी देशाला, राज्याला आणि भांडवलदारांना दाखवले आहे. कामगारांची ताकद फार मोठी आहे. कामगार क्रांती आणू शकतो, असे वाघेरे म्हणाले.