पिंपरी : वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले राजेंद्र हगवणे आणि कुटुंबाने थोरली सून मयूरी जगताप-हगवणे यांनाही मोटार आणि पैशांसाठी मारहाण केल्याचा आरोप आहे. राजकीय पाठिंब्याचा आणि मेव्हणा पोलीस अधिकारी असल्याचा धाक दाखवून गैरवर्तन करून अपंग भाऊ आणि आईला जिवे मारण्याची धमकी दिली, असे राज्य महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आले आहे.
मयुरी यांची आई लता आणि भाऊ मेघराज जगताप यांनी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. मयुरी यांचे २० मे २०२२ रोजी सुशील राजेंद्र हगवणे याच्याशी लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरे राजेंद्र हगवणे यांनी मोटार, पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यावरून ते त्रास देऊ लागले. राजेंद्र, सासू लता, दीर शशांक, नणंद करिष्मा हे मयुरी यांना मारहाण करत. भावाला आणि आईला मारून टाकू, अशी धमकी देत, असे या तक्रारीत म्हटले आहे.
वाद झाल्यानंतर सामंजस्यातून तो मिटविला जात होता. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली. सासू, सासरे मयुरी यांना सोडण्याची तिच्या पतीकडे मागणी करीत होते. त्याचा राग मयुरीवर काढला जात होता. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पती घरात नसताना सासू, सासरा, दीर, नणंद यांनी मयुरी यांना मारहाण केली. सासरा आणि दिराने त्यांच्याशी गैरवर्तन केले. मुलगा होत नसल्याचे म्हणत शिवीगाळ केली. मयुरी मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत असल्याचे लक्षात येताच दीर शशांकने मोबाइल हिसकावून पळ काढला. मयुरी यांनी त्याचा पाठलाग केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. पोलिसांत तक्रार दाखल करू शकत नसल्याचा फायदा घेऊन सासू, नणंदेने मयुरी यांच्याच विरोधात पोलिसांत तक्रार दिली, असे राज्य महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
‘एकाच दिवशी परस्परविरोधी तक्रारी’
‘आमच्याकडे एकाच दिवशी दोन तक्रारी ई-मेलद्वारे दाखल झाल्या. सुरुवातीला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मयुरी यांचे बंधू मेघराज जगताप यांनी तक्रार केली. त्यानंतर रात्री १२ वाजता मयुरी यांची नणंद करिष्मा हगवणे हिची मेलवरून तक्रार आली. एकाच दिवशी दोन तक्रारी आल्यानंतर बावधन पोलिसांकडे या तक्रारी पाठवल्या आणि कारवाईच्या सूचना दिल्या. एकाच कुटुंबातील वादातून परस्परविरोधी तक्रारी आल्या होत्या. कौटुंबिक वाद पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये समुपदेशनाद्वारे मिटविण्यात यावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. नियमानुसार तीन वेळा समुपदेशन करणे गरजेचे असते. त्यानुसार प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे,’ असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले.