पुणे : शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे महापालिका प्रशासनाने केलेल्या पावसाळापूर्व कामांचा दर्जा उघड झाला असला, तरी शहरातील पावसाळी गटारे आणि नालेसफाईची कामे ६५ ते ७० टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ‘अचानक पडलेल्या पावसामुळेच रस्त्यांवर पाणी साचले.
महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून तक्रारींचे निवारण केले,’ असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.शहरात मंगळवारी झालेल्या पावसानंतर चेंबर, तसेच पावसाळी गटारे तुंबल्याने शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले होते. चेंबरच्या झाकणांवर अनेक ठिकाणी कचरा साठला होता. जागोजागी पाणी साचल्याने त्यामधून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत होती. महापालिकेने योग्य ती उपाययोजना न केल्याने झाडांच्या फांद्या पडणे, पावसाचे तसेच ड्रेनेजचे पाणी सोसायटीत शिरल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधून महापालिकेची बाजू मांडली.
‘शहरात पावसाळापूर्वीच्या कामासाठी नालेसफाई करण्यासाठी १४.५० कोटी रुपयांच्या, तर पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी १२ कोटी रुपयांच्या निविदांना मान्यता दिली आहे. एप्रिल महिन्यापासून ही कामे सुरू केली असून, ७ जूनपर्यंतची कामांना मुदत आहे. आतापर्यंत नालेसफाई, पावसाळी गटारे स्वच्छतेची कामे ६५ ते ७० टक्के पूर्ण झाली असून, पुढील काही दिवसांत ती पूर्ण होतील,’ असे पृथ्वीराज यांनी सांगितले. हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. काही भागांत ६०, तर काही ठिकाणी १२० मिमी पाऊस पडला. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचणी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘पावसाला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रारी येण्यास सुरुवात झाली. पाणी तुंबणे, पाणी शिरणे अशा ४६ तक्रारी महापालिकेकडे आल्या. तक्रारींची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यात आल्या. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत महापालिका कर्मचारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरून काम करीत होते,’ असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी सांगितले.
महापालिका कर्मचारी वाहतूककोंडीही सोडविणार
पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते. वाहतूककोंडी निर्माण होते. केवळ पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी प्रयत्न करणे हे काम कर्मचाऱ्यांनी न करता रस्त्यावर झालेली वाहतूककोंडीदेखील सोडविण्याची जबाबदारी घ्यावी, अशा सूचना महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात त्याची अंमलबजावणी होताना दिसेल. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला असून, तीन जणांची टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये अभियंता, आरोग्य निरीक्षक, बिगारी यांचा समावेश असणार आहे, असेही पृथ्वीराज यांनी सांगितले.
‘धोकादायक फलक काढून टाका’
शहरातील बेकायदा जाहिरातफलक, फ्लेक्स, बॅनर तातडीने काढून टाकण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना केल्या. मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे काही भागांत फ्लेक्स पडल्याचे प्रकार घडले होते. शहरातील जाहिरातफलक, फ्लेक्स यांचे संबंधित मालकांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. बेकायदा फलक काढून टाका, असा आदेश त्यांनी दिला.