पुणे : जड-अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांच्या मागण्यांबाबत सरकारच्या पातळीवर मंगळवारी मंत्रालयीन पातळीवर तोडगा निघाला नसल्याने मालवाहतूक करणारे (ट्रक, टॅम्पो, टँकर आणि ट्रेलर) वाहनचालक मध्यरात्री बारा वाजल्यापासून बेमुदत संपावर गेले आहेत. प्रवासी वाहतूक संघटना आणि शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी संपातून तूर्तास माघार घेत, दोन दिवसांनंतर संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
‘विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मालवाहतूक करणाऱ्या राज्यभरातील संघटनांनी संप सुरू केल्याने अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले, तसेच औषधांसह जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक खंडित होणार आहे. त्यामुळे जनसामान्यांवर संपाचा परिणाम होणार आहे,’ असे महाराष्ट्र राज्य, माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, ‘वाहतूक संघटनेच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. १६ जून रोजी राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २९ जूनपर्यंत आझाद मैदानात उपोषण करण्यात आले. मात्र, सरकारकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी प्रवासी आणि शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनांची बैठक घेण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. त्यामुळे तूर्तास या संघटना संपात सहभागी झालेल्या नाहीत,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
वाहतूकदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज (२ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत अपेक्षित तोडगा न निघाल्यास दोन दिवसांत राज्यातील शालेय बस-व्हॅनचालक संपात सहभागी होतील. सुरू झालेल्या संपाला संघटनेचा पाठिंबा आहे.- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस असोसिएशन
मागण्या काय?
सक्तीच्या ई-चलनवसुलीला तत्काळ स्थगिती द्यावी, वाहनांवर लागू केलेला दंड माफ करावा, ई-चलन तक्रारींचे निराकरण करावे, शहरातील अवजड वाहनांची प्रतिबंधित वेळ वाढवावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.