पिंपरी: बोपखेल व खडकीस जोडणा-या मुळा नदीवरील पुलाचे काम प्रशासकीय राजवटीत अतिशय संथ गतीने सुरु आहे. या संथ कारभाराचा बोपखलवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी असताना पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले मात्र प्रशासकीय राजवटीत दहा टक्के कामाला घरघर लागली. दीड वर्षात काम पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप भाजपच्या माजी उपमहापौर हिराबाई घुले यांनी केला.

महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे बोपखेल गावासाठी दापोडीतील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) हद्दीतून जाणारा हा नागरी रस्ता अचानक १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला. तेव्हापासून बोपखेलच्या रहिवाशांना १५ किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. या नागरिकांसाठी मुळा नदीवर बोपखेल व खडकीस जोडणारा एक हजार ८६६ मीटर लांबीचा पूल उभारण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा… पॅनकार्ड अद्ययावत करण्याचा फोन आला तर सावधान!… पुण्यात निवृत्त सनदी लेखापालाची अशी झाली फसवणूक

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले होते. प्रशासकीय राजवटीत दहा टक्के काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु, प्रशासकीय राजवटीत या कामासाठी प्रचंड विलंब होत आहे. कामाला गतिरोधक लागला आहे. टप्प्या-टप्प्याने आणि अतिशय संथ गतीने काम सुरू आहे. बोपखेलमधील नागरिकांचा वेळ, पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. त्यामुळे त्वरित काम पूर्ण करुन नागरिकांना पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

१५ किलो मीटरचा वळसा

बोपखेलवासीयांना पिंपरी, दापोडीत ये-जा करण्यासाठी दिघीतून १५ किलो मीटरचा वळसा मारावा लागत आहे. एवढ्या मोठ्या अंतरामुळे गेल्या आठ वर्षांपासून बोपखेलवासीय त्रस्त आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगरसेवक असताना बोपखेल पुलाचे काम वेगात सुरु होते. प्रशासकीय राजवटीत पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. प्रशासकांना दीड वर्षात दहा टक्के काम पूर्ण करता आले नाही. प्रशासन बोपखेलवासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. – हिराबाई घुले, माजी उपमहापौर, माजी स्थानिक नगरसेविका