लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाल्याचे जागतिक हवामानशास्त्र संस्थेने जाहीर केले आहे. चालू वर्षाच्या उत्तरार्धातही एल निनो स्थिती कायम राहण्याची शक्यता ९० टक्के असून, या स्थितीमुळे जागतिक तापमानवाढ, हवामान बदलांचा अंदाजही वर्तवण्यात आला.

जागतिक हवामानशास्त्र संस्थेने एल निनो स्थिती जुलैमध्ये विकसित होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अँड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (एनओएए) या संस्थेच्या हवामान अंदाज विभागाने जवळपास महिनाभर आधीच, म्हणजे ८ जून रोजी एल निनो स्थिती निर्माण झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता जागतिक हवामानशास्त्र संस्थेनेही अधिकृतरीत्या एल निनो स्थितीची माहिती दिली.

हेही वाचा… पुणे: वारजेमध्ये पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक; एक पोलीस कर्मचारी जखमी

जुलै ते सप्टेंबर या काळात एल निनो स्थिती राहून त्याचे परिणाम या वर्षअखेरीपर्यंत राहतील. ‘एन्सो’ (एन निनो सदर्न ऑसिलेशन) स्थिती निर्माण होण्याची शक्यता १० टक्के आहे, तर ला निना स्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता जवळपास नाही. एल निनो स्थिती दर दोन ते सात वर्षांनी निर्माण होते. सर्वसाधारणपणे ही स्थिती नऊ ते बारा महिने राहते. प्रशांत महासागराचे तापमान वाढल्यामुळे ही स्थिती निर्माण होते, असे जागतिक हवामानशास्त्र संस्थेने नमूद केले. एल निनो स्थितीमुळे भारतातील मोसमी पावसावर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा… ४४ लाख मतदार ठरविणार पुणे, पिंपरी-चिंचवडचे ‘कारभारी’

एल निनो स्थिती निर्माण झाल्याने जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. त्यात तापमानाचे विक्रम मोडले जाणे, जगभरात विविध ठिकाणी तीव्र उष्णता असे त्याचे स्वरूप असू शकेल. एल निनो स्थिती निर्माण झाल्याचे जाहीर करून जागतिक हवामानशास्त्र संस्था जगभरातील सरकारांना आरोग्य, परिसंस्था, अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबाबत संकेत देत आहे. जीवनमानावर कमीत कमी परिणाम होण्यासाठी तीव्र हवामान बदलांबाबत पूर्व इशारा आणि त्या अनुषंगाने पूर्वतयारी करणे आवश्यक आहे, असे जागतिक हवामानशास्त्र संस्थेचे प्रा. पेट्टेरी तालास यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार

पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहील. तीन ते चार दिवसांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आली. गेल्या चोवीस तासांत सांताक्रुझ येथे ३६ मिमी, महाबळेश्वर येथे ६०, छत्रपती संभाजीनगर येथे १२, सोलापूर येथे सहा, रत्नागिरी येथे २५, अलिबाग येथे १७ मिमी पावसाची नोंद झाली.