''विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र टीका द्वेष नसायला हवा मात्र अलीकडे ते पाहायला मिळते. राजकारण चुकीच्या दिशेला जातं का?'' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमास ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह आजीमाजी आमदार, पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी ''काश्मिरमधील एक घटक निघून गेला, त्यावर एक सिनेमा आला, काँग्रेसवर टीका झाली. मन जोडण्याऐवजी मन तोडण्याच काम झालं. समाजात विद्वेष पसरायला मदत केली जाते, गांधींवर टीका टिप्पण्णी या चित्रपटाच्या माध्यमातून केली जाते. काश्मीर मधून काश्मिरी पंडित बाहेर पडले तेव्हा सत्तेत काँग्रेस नव्हती, तर व्हीपी सिंह यांची सत्ता होती. भाजपाचं त्याला सहकार्य होते म्हणजे भाजपाच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले. मतभेद, मतभिन्नता असू शकते मात्र परस्परबाबत सन्मान असण्याची गरज आहे. गांधी, नेहरूंनी देशाला दिशा दिली नुसते स्वातंत्र्य दिले नाही. देशाला एकसंघ ठेवायचं आहे.'' असंही बोलून दाखवलं.