अपुरे मनुष्यबळ आणि त्याअभावी खंडित झालेले उपक्रम.. गेल्या दशकभरापासून नसलेले पूर्णवेळ संचालक.. चित्रपटाच्या डिजिटलायझेशन प्रकल्पाची कासवगतीने होत असलेली वाटचाल.. या समस्यांनी देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (नॅशनल फिल्म अर्कायव्हल ऑफ इंडिया) ग्रासले आहे. एवढेच काय, पण संग्रहालयाचा सुवर्णमहोत्सव सुरू होऊन सहा महिन्यांहून अधिककाळ लोटला असला तरी एकही कार्यक्रम न झाल्यामुळे सुवर्णमहोत्सवाचाच विसर पडला आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चित्रपटांचे जतन आणि अभ्यास करण्याच्या उद्देशातून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय ही संस्था पुण्यामध्ये स्थापन करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सुरूवात झाली असून फेब्रुवारी २०१५ पर्यंत सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांमध्ये संस्थेमध्ये सुवर्णमहोत्सवाचा एकही कार्यक्रम होऊ शकलेला नाही. अपुरे मनुष्यबळ ही संस्थेची मूलभूत समस्या असून गेल्या दहा वर्षांपासून पूर्णवेळ संचालकदेखील नाहीत. यापूर्वी संचालकपदाचे काम केलेले विजय जाधव आणि सध्या संचालक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत पाठराबे यांच्याकडे संग्रहालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त पदभार आहे. जाधव हे ‘प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो’चे (पीआयबी) संचालक होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे नंतर पाठराबे यांच्याकडे पीआयबीच्या संचालकपदाची धुरा आली. जाधव यांच्याप्रमाणेच सध्या पाठराबे यांच्याकडे संग्रहालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. या दोन्ही कामांच्या ताणामुळे ते संग्रहालयाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, या वास्तवावर ‘वसुंधरा क्लब, पुणे’चे संयोजक आणि किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव यांनी प्रकाश टाकला आहे. या समस्या सोडविण्यासाठी चित्राव यांनी थेट माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनाच साकडे घातले आहे.
संग्रहालयामध्ये डिजिटलायझेशन, प्रशासकीय आणि ग्रंथालय असे विविध विभाग आहेत. या विभागांमध्ये मिळून ४५ कर्मचारी असणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत निवृत्त झालेल्या जागांची भरती न झाल्यामुळे या तीनही विभागात मिळून १५ जागा रिक्त आहेत. संस्थेमध्ये आवश्यकतेएवढेही मनुष्यबळ नसल्याने येथील कर्मचाऱ्यांना वाढीव काम करावे लागत आहे. चित्रपट जतनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे नेमक्या किती चित्रपटांचे डिजिटलायझेशन पूर्णत्वास गेले याची माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ ही संकल्पना प्राधान्याने राबवून डिजिटलायझेशन प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी वीरेंद्र चित्राव यांनी केली आहे.
‘हे प्रश्न मंत्रालयाशी संबंधित’
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील अपुरे मनुष्यबळ आणि डिजिटलायझेशन प्रकल्पाची गती, हे प्रश्न माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी संबंधित असून या विषयी आपण माहिती देऊ शकत नाही, असे संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला सुवर्णमहोत्सवाचा विसर!
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा सुवर्णमहोत्सव सुरू होऊन सहा महिन्यांहून अधिककाळ लोटला असला तरी एकही कार्यक्रम न झाल्यामुळे सुवर्णमहोत्सवाचाच विसर पडला आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
First published on: 12-08-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Too many problems facing national film archival of india