पिंपरी: चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. तळेगाव, आंबेठाण चौकातील महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसचे थांबे शंभर मीटर पुढे नेले जाणार आहेत. मजूर अड्डा दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. येत्या सात दिवसांत अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठक घेतली. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक करंदीकर, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा… रिक्षा, कॅबचालकांनी बंद करताच आरटीओ ॲक्शन मोडवर! ओला, उबरची बैठक घेणार

चाकण परिसर हा अत्यंत वेगाने विकसित होणारा औद्योगिक परिसर आहे. रहिवाशी भागही वाढत आहे. कामगार वर्ग, उद्योजक, साहित्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असलेले अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. चाकणमधील तळेगाव चौक, आंबेठाण चौकातील वाहतूक कोंडी मोठी समस्या बनलेली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील कामगार वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी उद्योजकांनी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी बैठक घेत संबंधितांना विविध सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडकरांची पसंती दुचाकीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात दिवसांत अतिक्रमणे काढणे, रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याबाबत उपाययोजना करण्याचा निर्णय बैठकीत झाला. तसेच म्हाळुंगेतील पुलाचे स्थापत्य विषयक लेखापरीक्षण, पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी सांगितले.