गणेश यादव
पिंपरी : चिखली आणि परिसरातील सुमारे ९० हजार नागरिकांचा पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाइपद्वारे पाटीलनगर येथील जलकुंभात पाणी दिले जाणार आहे. पवना आणि आंद्रा प्रकल्पातील एकत्रित पाणी मिळणार असल्याने भोसरीजवळील समाविष्ट गावांतील पाणी समस्या सुटणार आहे.
चिखलीत महापालिका प्रशासनाने २० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारला आहे. या जलकुंभात पवना प्रकल्पातील रावेत बंधाऱ्यातून सुमारे १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी दिले जाते. एक दिवस २० ते २२ तास आणि दुसऱ्या दिवशी तीन ते चार तास पाणी पुरवठा होतो. आता प्रशासनाने आंद्रा प्रकल्पातील पाण्यासाठी चिखली येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. त्यातील पाणी पाटीलनगर येथील जलकुंभात आणण्यासाठी ६०० एमएम जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यामुळे पवना आणि आंद्रा अशा दोन्ही प्रकल्पाचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
आणखी वाचा-पुणे: ससूनचा अजब कारभार!आयुर्वेदिक डॉक्टर बनला ससूनच्या अधिष्ठात्यांचा ‘पीए’
समाविष्ट गावांत भविष्यातील ३० वर्षांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी पुरवठा यंत्रणा सक्षम केली जात आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे. आंद्राचे पाणी पाटीलनगर येथील जलकुंभात दाखल होईल. त्यामुळे पाणी समस्या सुटण्यास मदत होईल. -महेश लांडगे, आमदार