पिंपरी : झपाट्याने विस्तारत असलेल्या वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, चऱ्होली, मोशी, डुडुळगाव या उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर झाली आहे. बोअरवेल आटल्याने गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अपुरा, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात मोठी घट झाल्याने शहरात पाणीटंचाई भासत असून पाच दिवसांपासून समाविष्ट गावे तहानलेलीच आहेत.

गेल्या चार वर्षांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये दहा महिने घट होते. मात्र, एप्रिल-मे सुरू होताच त्यामध्ये वाढ होते. त्यातच इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्याला गळती लागली असून, आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. तीन ते चार दिवसांपासून तर अवघे २१ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहरासाठी मिळाले. सुमारे ५९ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये पाणी समस्या भीषण झाली आहे. सुरळीत व मुबलक पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याने प्रशासनावर अवलंबून न राहता वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चऱ्होली, मोशी, डुडुळगावातील रहिवाशांनी बोअरवेलचा आधार घेतला; मात्र, उन्हाळ्यात बोअरवेल आटतात. काहींचे पाणी कमी होते. पालिकेचे पाणीदेखील कमी दाबाने येते. त्यामुळे एप्रिल महिना सुरू होताच या भागातील नागरिकांची पाण्याअभावी होरपळ सुरू असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात टँकरच्या पाण्यावर लाखो रुपये खर्चून तहान भागवावी लागते.

हेही वाचा… दोन दिवस होरपळीचे! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, रात्रीच्या उकाडय़ातही वाढीचा अंदाज

शहराची झपाट्याने वाढ होत असून, मोठ्या गृहनिर्माण संस्था विकसित होत आहेत. परिणामी, शहराची लोकसंख्या २७ लाखांवर गेली आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी पालिका प्रतिदिन पवना धरणातून ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी), आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात ८०, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) २० असे ६१० एमएलडी पाणी उचलते. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून आंद्रा धरणातून अतिशय कमी पाणी मिळत आहे. गुरुवारी तर अवघे २१ एमएलडी पाणी मिळाले होते. त्यामुळे मोठी तूट झाली. परिणामी, समाविष्ट भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शहराच्या विविध भागांतून अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आल्या. तूट भरून काढण्यासाठी पालिकेने पवना धरणातून दहा एमएलडी अधिकचे पाणी उचलण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्याच्या सुटीत नागरिक गावाला जातील. त्यानंतर १५ एप्रिलनंतर सुसूत्रता येईल. लवकरच आंद्रा धरणातून पाणी कमी मिळण्याचा प्रश्न सुटेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

महापालिकेचा दावा काय?

ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित नाही, त्या संस्थांमधील सभासदांना मानकांप्रमाणे प्रतिदिन प्रतिमाणशी १३५ लिटरप्रमाणे पाणी दिले जाते. तर, सांडपाणी प्रक्रिया कार्यान्वित असलेल्या संस्थेतील सभासदांना ९० लिटर प्रतिमाणशी पाणी दिले जात असल्याचा पालिकेचा दावा आहे. प्रत्यक्षात अतिशय कमी, अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा… पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके

दिवसाला ३० तक्रारी

विस्कळीत, अपुरा अशा पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये दिवसाला ३० तक्रारी पालिकेकडे येत आहेत. आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात मोठी घट झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गृहनिर्माण संस्थेतील बोअरवेल आटल्याने नागरिकांची पूर्ण भिस्त पालिकेकडून मिळणाऱ्या पाण्यावर असल्याने मागणी वाढली आहे. ज्या भागात पाणीपुरवठा झाला नाही, तिथे टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.