पुणे : महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील १६ चितळांच्या मृत्यूच्या संदर्भातील अहवाल आला असून, ‘लाळ खुरकत’ या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण झाल्याचे निदान झाले आहे. हा आजार इतर प्राण्यांना होऊ नये, यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे. तसेच, इतर बाधित चितळांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील १६ चितळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. महिना ते पंधरा दिवसांत हे मृत्यू झाले होते. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातदेखील याचे पडसाद उमटले होते. मृत चितळांच्या मृत्यूच्या निदानाकरिता विविध शासकीय संस्थाना समाविष्ट करण्यात आले होते. मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून जैविक नमुने संकलित करण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ व विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाला बोलाविण्यात आले होते.
या पथकाने संकलित केलेले जैविक नमुने ओडिशा, भुवनेश्वर येथील राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, नागपूर येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग शाळा, येथे तपासणीसाठी पाठविले होते. भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेतून देण्यात आलेल्या अहवालामध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांना लाळ खुरकत या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण झाल्याचे निदान करण्यात आले आहे.
या अहवालावर सविस्तर चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्राणिसंग्रहालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या वन्य प्राणी आरोग्य सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला क्रांतिसिंह नाना पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विश्वासराव साळुंखे, विकृती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर मोटे, परजीवी शास्त्रविभाग प्रमुख डॉ. प्रशांत पवार, औषध शास्त्रविभाग प्रमुख डॉ. आंबोरे, सूक्ष्मजीव शास्त्रविभाग डॉ. दुषंत मुगळीकर निमंत्रित सदस्य म्हणून पशू संवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ. जी. एम. हुलसुरे उपस्थित होते.
चितळ प्राण्यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण हे लाळ खुरकत विषाणू संसर्ग आहे. या विषाणूच्या संक्रमणादरम्यान प्राण्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. प्रतिकूल वातावरण असेल, तर प्राण्यांची तणावाची पातळी वाढते. त्यामुळे प्राणी मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक असते. महापालिकेने तातडीने ठोस पावले उचलून विविध संस्थांकडून तपासणी करून घेतल्याने अल्प कालावधीत हा आजार नियंत्रणात आणण्यास यश आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, बाधित प्राण्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.