पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कोणी केला यावरून सध्या शहरात राजकारण रंगत आहे. गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. शहराचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्याचा दावा त्यांनी केला. यावरून राजकारण रंगल असून अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आपापल्या नेत्यांची नावे घेऊन शहराचा विकास केल्याचा दावा केला आहे.

शरद पवार यांनी शहराचा विकास केला असून उद्योगनगरी म्हणून शहराला नावा रुपाला आणल्याचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी म्हटलं, तर अजित पवार यांनी १९९१ पासून पिंपरी-चिंचवड शहराला काय नको, काय हवं ते पाहिलं. त्यांनीच विकास केल्याचं सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे. केंद्रातून शरद पवार यांची मदत झाली असे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शहराचा विकास कोणी केला यावरून कलगीतुरा रंगला आहे.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत की सत्तेने भ्रष्ट?”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल; म्हणाले, “इतकी मस्ती…”

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. राष्ट्रवादीचे अजित पवार हे काही आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यावरून अवघ्या महाराष्ट्रात राजकीय चर्चा रंगली. असं असताना आता पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट बघायला मिळत आहे. शरद पवार गटाचे स्वतंत्र कार्यालय असून शहराचा विकास हा शरद पवार यांनीच केल्याची वाच्यता अनेकदा शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. आता थेट शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी शरद पवार यांनीच शहराचा विकास केला असून शहरात एमआयडीसी आणि आयटी हब आणल्याने या शहराची ओळख कामगार नगरी म्हणून झालेली आहे, अस म्हटलं. त्यावेळी काही कंपन्या शहरातून जाणार होत्या. परंतु, शरद पवार यांनी मध्यस्थी करत त्या थांबवल्या. कदाचित त्या कंपन्या गेल्या असत्या तर पिंपरी-चिंचवड शहर कामगार नगरी म्हणून उदयास आले नसते. त्यामुळे शहराचा विकास हा शरद पवार यांनी केला असल्याचं ठाम मत तुषार कामठे यांनी व्यक्त केलं आहे.

कुटुंब म्हणून शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं. राजकीय वैचारिक मतभेद असू शकतात, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. तर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनीदेखील शहराचा विकास हा अजित पवार यांनी केल्याचा उल्लेख केला आहे. १९९१ साली अजित पवार हे पहिल्यांदा खासदार झाले. तेव्हापासून आजतागायत अजित पवार यांचं शहरावर बारीक लक्ष आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. शहरासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. हे शहरातील प्रत्येक नागरिकाला माहीत आहे. केंद्रातून शरद पवार यांची मदत झाली, ते केंद्रात असल्याने त्याचा फायदा झाला. परंतु, स्थानिक पातळीवर अजित पवार हेच बघायचे, असं सूचक वक्तव्य लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना केलं.

हेही वाचा – “फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराचा विकास होण्याकरिता अजित पवार यांनी पाठपुरावा केला. शहरात रोहित पवार येत असले तरी पिंपरी-चिंचवड शहरात पुतणे विरुद्ध चुलते असा सामना नाही, असं स्पष्टीकरणदेखील त्यांनी दिल आहे. त्यांच्यात तुलना करणे योग्य नाही. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत त्याचे आम्हाला दुःख आहे. दोन गट पडायला नको होते. राष्ट्रवादी हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे दोन भाग झाल्याचं नेहमीच आम्हाला वाईट वाटतं. शरद पवार आणि अजित पवार यांना पुन्हा एकत्र पाहायला आवडेल, असेदेखील त्यांनी म्हटले.