पुणे : अनैतिक संबंधांच्या संशयावरुन महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने तिचा मृतदेह गॅरेजमध्ये जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने राख नदीत टाकून दिली आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा सखोल तपास करुन पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे आरोपी पतीने महिलेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अंजली समीर जाधव (वय ३८ रा. श्री स्वामी समर्थ संकुल, एनडीए-वारजे रस्ता, शिवणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती समीर पंजाबराव जाधव (वय ४२) याला अटक करण्यात आली. पत्नी अंजली ही २८ ऑक्टोबर रोजी वारजे परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आरोपी समीर याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. ‘या प्रकरणात कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी सखोल तपास करुन खून प्रकरणाचा उलगडा केला आणि आरोपी पती समीर याला अटक केली’, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी समीर याचे शिवणे परिसरात गॅरेज आहे. पत्नीचे एकाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय समीरला होता. त्याने समाजमाध्यमातील संवादावरुन पत्नीवर आरोप केले होते. या कारणावरुन त्यांच्यात वादही झाले होते. त्यानंतर त्याने पत्नीचा खून करण्याचा कट रचला. त्याने मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील खेड शिवापूर परिसरातील शिंदेवाडी भागात गोदामासाठी एक जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यसाठी दरमहा १८ हजार रुपये भाडे ठरले होते. २६ ऑक्टोबर रोजी पत्नी खेड शिवापूरजवळील गोगलवाडी परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर हे प्रकरण ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आले होते. मात्र, वारजे पोलिसांनी याप्रकरणाचा समांतर तपास सुरू ठेवला होता. पत्नी बेपत्ता झाल्यानंतर समीर वारजे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आला होता. ‘पत्नीचा शोध लागला का ?’ अशी विचारणा त्याने पोलिसांकडे केली होती. वारंवार चौकशी करणाऱ्या समीरच्या हालचाली पोलिसंनी टिपल्या होत्या. त्याचे वर्तन संशयास्पद वाटले होते. त्याने पोलिसांना दिलेल्या माहिती तफावत आढळून आली होती. पोलिसांनी ही बाब टिपली आणि त्याची चौकशी केली.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली होती. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. २६ ऑक्टोबर रोजी समीर हा पत्नीला फिरायला नेण्याच्या बहाणा करुन बाहेर पडला. मोटारीतून दोघे जण खेड शिवापूरजवळील मरीआई घाटात गेले. तेथून ते परतले. त्यानंतर खेड शिवापूर परिसरातील एका दुकानातून भेळ घेतली. शिंदेवाडी परिसरात भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत तिला नेले. त्याने एक लोखंडी पेटी तयार करुन ठेवली होती. त्याने एका वखारीतून लाकडेही आणून ठेवली होती. गोदामात पत्नी भेळ खात होती. त्यावेळी तिचे लक्ष नसल्याची संधी साधून त्याने गळा आवळला. दहा ते पंधरा मिनिंटे गळा आवळल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह लोखंडी पेटीत भरला. भट्टी पेटवून तिचा मृतदेह जाळला. मृतदेह जाळल्यानंतर राख नदीपात्रात टाकून दिली, अशी कबुली आरोपी पती समीर याने पोलिसांना दिली. त्यानंतर याप्रकरणात त्याला अटक करण्यात आली.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रकाश धेडे, नीलेश बडाख, उपनिरीक्षक संजय नरळे, नितीन गायकवाड, गणेश कर्चे, सुनील मुठे, योगेश वाघ, शरद पोळ, शिरीष गावडे यांनी ही कामगिरी केली.
