पुणे : राज्यात साधारणत: एप्रिलच्या पंधरवडय़ानंतर कमाल तापमानाचा पारा वाढत असतो. यंदा मात्र गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अनेक भागांत एप्रिलच्या पहिल्या पंधरा दिवसांतच तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले आणि सलग एक महिन्यांहून अधिक काळ कमाल तापमानाचा पारा सरासरीच्यापुढे राहिल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्यातील तापमानाचे हे यंदाचे वैशिष्टय़ समजले जात आहे. उत्तर-पश्चिम भारतामध्ये फेब्रुवारीच्या अखेपर्यंत पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव होता. त्यामुळे या भागात ढगाळ हवामानाची स्थिती होती. परिणामी तापमानात मोठी वाढ होऊ शकली नाही. मार्चमध्ये मात्र संपूर्ण उत्तर भारतामध्ये कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती तयार झाली. याच कालावधीत महाराष्ट्रातही निरभ्र आकाश होते. मार्चच्या सुरुवातीपासून उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आणि तेथून कोरडे-उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागले. हा परिणाम संपूर्ण मार्च महिन्यात टिकून होता. सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर मुंबईसह कोकण परिसर, विदर्भ तसेच मराठवाडय़ात उष्णतेच्या लाटा आल्या. अनेक भागांत विक्रमी तापमानाची नोंद झाली. मार्चपाठोपाठ एप्रिलमध्येही उत्तर-पश्चिम भारतातील उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहिली. एप्रिलच्या पहिल्याच टप्प्यात जम्मू-काश्मीर, हिमालयीन विभागासह मध्य भारतापर्यंत उष्णतेची लाट आली. उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहत असल्याने एप्रिलच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत राहिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन ते तीन टप्प्यांत उष्णतेच्या लाटा आल्या. मुंबई परिसरासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गात तापमान सरासरीच्या पुढे राहिले. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, पुणे, नाशिक, जळगाव, मराठवाडय़ातील परभणी, औरंगाबाद, नांदेड, तर विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान एप्रिलच्या पहिल्या पंधरवडय़ातच चाळिशी पार किंवा त्याच्या जवळ पोहोचले. मार्चनंतर एप्रिलच्या पंधरवडय़ापर्यंत राज्यात बहुतांश भागात किमान तापामानाचा पारा सलग तीस ते चाळीस दिवस सरासरीच्या पुढे राहिला. गेल्या दोन आठवडय़ांत.. विदर्भ आणि मराठवाडय़ात यंदाच्या एप्रिलमध्ये बहुतांश वेळा तापमानाचा पारा ४० अंशांपुढे राहिला. विदर्भात १४ एप्रिलनंतर तापमान ४४ अंशांच्या आसपास पोहोचले होते. एप्रिलच्या पंधरवडय़ात गेल्या अनेक वर्षांत या भागातील पारा वाढलेला दिसून आला. यंदा वेगळे काय? औरंगाबादमध्ये २०१२ मध्ये ९ एप्रिलला तापमान ४० अंशांवर गेले होते. त्यानंतर यंदा दहा वर्षांनंतर प्रथमच एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांत तापमान ४० अंशांवर गेले. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर आदी भागातही एप्रिलच्या सुरुवातीच्या टप्प्यात तापमान ४० अंशांपार गेले नव्हते. यंदा ते घडून आले. मुंबईत उष्णतेच्या लाटेची स्थिती.. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात गेल्या चोवीस तासांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. पुढील तीन दिवसांत राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर मुंबई परिसरात उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.