बालसाहित्याच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी टाटा ट्रस्टने पराग उपक्रमांतर्गत मुंबई लिटरेचर लाइव्हबरोबर ‘बिग लिटिल बुक अवार्ड’ (Big Little Book Award) ची स्थापना केली. २० नोव्हेंबर २०१६ ला हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला – लेखनासाठी माधुरी पुरंदरेंना (मराठी भाषा) आणि चित्रकारितेचा अथनू रॉय यांना. गेल्या सात वर्षांत टाटा लिटरेचर लाइव्ह या साहित्य संमेलनात लेखक, कवी, कादंबरी, कल्पनेतर पुस्तके, जीवनगौरव पुरस्कार दिले जात होते. त्यात यंदापासून बाल साहित्यकारांसाठी लेखन व चित्रकारितेच्या दोन पुरस्कारांची भर घालण्यात आली आहे.
बहुभाषिकतेला महत्त्व देत, दरवर्षी लेखनाच्या पुरस्कारासाठी वेगवेगळी भारतीय भाषा निवडली जाईल. बालसाहित्यात चित्रकाराची भूमिका खूप मोठी असते. लहान मुले पुस्तकांमधील शब्दांआधी चित्रांकडे आकर्षित होतात. चित्रकाराच्या या महत्त्वाच्या योगदानाला पुरेसे ओळखले जात नाही. भारतात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार असूनही त्यांच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष होते. या पाश्र्वभूमीवर, बालसाहित्याला राष्ट्रीय व्यासपीठावर मान्यता मिळावी, अनेक अडचणींचा सामना करत मुलांसाठी उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण करणाऱ्या लेखक- चित्रकारांना प्रोत्साहन मिळावे व पाठय़पुस्तकाच्या पलीकडे जाऊन आनंद मिळावा म्हणून वाचणे किती महत्त्वाचे आहे, याची समाज म्हणून आपल्या सर्वानाच आठवण व्हावी, यासाठी हा पुरस्कार.
सध्याची मुले वाचत नाहीत, पाचवीमधील ५० % मुलांना दुसरीचे पाठय़पुस्तकही वाचता येत नाही, हे आपण वरचे वर ऐकतो. सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये मुलांमधील सृजनशीलता, स्वतंत्रपणे विचार- विश्लेषण करण्याची क्षमता जोपासली जात नाही, हे अनेक अभ्यासांमधून अधोरेखित झाले आहे. याचं एक मोठं कारण आपली शिक्षणपद्धती आहे. केवळ पाठय़पुस्तके आणि परीक्षा यांचा अतिरेक, भारतीय भाषांमधील सकस- दर्जेदार लेखन, गोष्टींच्या पुस्तकांचा घरी आणि शाळेत असलेला अभाव हेही त्यामागील कारण आहे, याकडे दुर्लक्ष केले जाते.
संवेदनशीलता आणि विनोद
माधुरी पुरंदरे यांनी मराठी बालसाहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. अगदी लहान मुलांसाठी ‘राधाचं घर’ व ‘यशाच्या गोष्टी’पासून ‘त्या एका दिवशी’ आणि ‘हॅनाची सूटकेस’ (अनुवादित)च्या रूपाने किशोरवयीन मुलांसाठी लिहिले आहे. मुलांच्या बालविश्वाला बारकाईने टिपत, विनोद, नवाचार, संस्कृती यांची गुंफण घालत माधुरीताईंच्या गोष्टी उलगडत जातात. कृत्रिमता नसलेली, ओघवती, मुलांशी संवाद साधणारी माधुरीताईंची भाषाशैली बालसाहित्याला समृद्ध करते. त्यांच्या पुस्तकांमधील प्रश्न विचारणारी, भांडणारी, रुसणारी, कल्पना करणारी मुलं आपल्या मनात वास्तव्य करतात. या अवार्डच्या परीक्षक प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘माधुरीताईंच्या लेखनात संवेदनशीलता आणि विनोद यांची दुर्मिळ गुंफण आढळते.’’ माधुरीताई शब्द आणि चित्र या दोन्ही माध्यमांतून गोष्ट, पात्रं, सांस्कृतिक परिवेश आणि मुलांचे भावविश्व आपल्या समोर उलगडतात.
पहिल्याच वर्षी या पुरस्कारासाठी झालेली मराठी भाषेची निवड ही आपल्याला मराठीत मुलांसाठी उत्तम लेखन केलेल्या साने गुरुजी, भा. रा. भागवत, शांता शेळके, विंदा करंदीकर, प्रकाश नारायण संत अशा साहित्यिकांच्या महत्त्वाच्या कामगिरीची आठवण करून देते. माधुरीताईंना मिळालेला पुरस्कार भारतीय भाषांमध्ये होणाऱ्या दर्जेदार लेखनाला मिळालेली दाद आहे.
परंतु पुरस्कार मिळाल्यानंतरच्या मुलाखतीत माधुरीताईंनी म्हटल्याप्रमाणे, भारतीय बालसाहित्यात नवनवीन प्रयोग होण्याची, वेगवेगळे विषय हाताळण्याची, ‘आजच्या’ मुलांच्या विश्वाशी जुळणाऱ्या लेखनाची गरज आहे. असे अधिकाधिक लेखन प्रकाशित व्हावे, उत्तम बालसाहित्य जास्तीतजास्त मुलांपर्यंत पोहोचावे यासाठी पालक, शिक्षक, ग्रंथपाल, विक्रेते, लेखक, चित्रकार, प्रकाशक यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. बिग लिटिल बुक अवार्ड त्यासाठी एक व्यासपीठ बनेल, ही आमची आकांक्षा आहे.
बदलती चित्रशैली
गेल्या २५-३० वर्षांत बालसाहित्यात उत्कृष्ट चित्रकारीची कामगिरी केलेल्या अथनू रॉय यांना यंदाचे पहिले चित्रकलेसाठीचे बिग लिटिल बुक अवार्ड मिळाले. पुरस्काराच्या मानपत्रात म्हटल्याप्रमाणे, अथनू रॉय यांनी चित्रकलेची शैली काळानुसार, प्रकाशनासाठी उपलब्ध असलेल्या संसाधनानुसार बदलली. २५ वर्षांपूर्वी रंगीत छपाई, बालसाहित्यासाठी उपलब्ध कागदाचा दर्जा अशा बाबींवर मात करत रंग-रेषांच्या माध्यमातून गोष्टीला चित्रमय रूप दिले आणि मुलांना गोष्टींच्या जवळ नेले. कथेच्या गरजेनुसार कधी खेळकर, कधी विनोदी, तर कधी गंभीर भाव जागृत करणारी, मुलांना व मोठय़ांना मुग्ध करणारी चित्रं काढली. मुलांसाठीच्या १०० पुस्तकांसाठी चित्रण करणाऱ्या रॉय यांनी लेखकाने रचलेल्या गोष्टीला, पात्रांना वाचकांसमोर खुलवले. १९९२ च्या ‘टेल्स’ मधील वास्तविक चित्रण असो वा ‘चिकनिक चू’मधील खेळकर प्राण्यांचे हलक्या रंगातील पाण्यातील चित्रण अथवा ‘गिज्जीगडू’ या मोठय़ा आकाराच्या पुस्तकामधील सूक्ष्म बारकावे टिपणारी मंत्रमुग्ध करणारी चित्रं असोत वा ‘घुमान्तुको का डेरा’ या काव्यसंग्रहामधील कवितेचा भाव आपल्यापर्यंत पोहोचवणारी रेखाचित्रं असोत, रॉय यांच्या वैविध्यपूर्ण शैलीने, सर्जनशीलतेने कविता, गोष्टी आपल्या मनात घर करतात, त्याचे अनोखे पदर आपल्यासमोर उलगडून दाखवतात.
भारतीय बालसाहित्यामधील दोन महत्त्वाच्या, कर्तबगार लेखक – चित्रकारांचा सन्मान करून बिग लिटिल बुक अवार्डची समर्पक सुरुवात झाली आहे. दीर्घकाळ बालसाहित्यात समर्पित भावनेने उच्च दर्जाचे काम करणाऱ्या बालसाहित्यकारांच्या कामाकडे सर्वानीच अधिक लक्ष देण्याची वेळ आली आहे. मुलांसाठी लिहिणे हे महत्त्वाचं व जोखमीचं काम आहे, त्यासाठी प्रतिभेची गरज आहे, हे आपण कधी ध्यानात घेणार? स्वतंत्र विचार करणारी, प्रश्न विचारणारी, आपला विचार इतरांसमोर मांडू शकणारी पिढी घडवायची असेल तर उत्तम साहित्याला पर्याय नाही, याची आपल्या सर्वानाच जाणीव व्हायला हवी.