श्रीगोंदवलेकर महाराज श्रीमंतीची व्याख्या समाधानावर आधारित करतात आणि पुढे सांगतात की, ‘‘देहाला सुख देऊन मनाला सुख येणार नाही. समाधान मनाचा धर्म आहे. मन भगवंताशी चिकटले तर समाधान येईल.’’ आपण पैसा मिळवतो आणि त्यातून देहकष्ट कमी करणारी आणि देहाला सुख देणारी साधनं विकत घेतो. आपण असं मानतो की माझा देह सुखी झाला, माझ्या देहाला सुख मिळालं की मन सुखी होईल. आपण मागेच पाहिलं होतं की, प्रत्यक्षात मनच सुखासाठी धडपडत असतं आणि त्या सुखाच्या भोक्तेपणाचा आरोप देहावर लादला जातो. आपण नेत्रसुख म्हणतो पण पाहाण्याचं सुख डोळ्यांना नसतं, ते मनालाच होत असतं. आपली कुणी स्तुती केली तरी ती ‘कानांना गोड लागते’ असं आपण मानतो. प्रत्यक्षात कानांना काहीच वाटत नसतं, श्रवणाचं ते सुख मनालाच होत असतं. तेव्हा देहाला सुखी ठेवण्याची धडपड ही प्रत्यक्षात मनाचीच धडपड आहे. मनालाचं वाटतं की अमक्या अमक्या प्रकारे देहाला सुख मिळालं की मी सुखी होईन. श्रीमहाराज मात्र सांगतात, समाधान काय किंवा असमाधान काय, हे मनाचेच धर्म आहेत. मनच सुखी होतं मनच दुखी होतं, मनच मोहरतं मनच कोमेजतं, मनच खचून जातं मनच उभारी घेतं, मनच समाधानी होतं मनच असमाधानी राहातं. तेव्हा मनाला समाधान हवं असेल तर ते पैशाला चिकटून साधणार नाही. किंबहुना कोणत्याही अस्थिर गोष्टीवर अवलंबून मन स्थिर होऊ शकणार नाही. कोणत्याही अशाश्वत गोष्टीला चिकटून मन शाश्वत सुख भोगू शकणार नाही. कोणत्याही चंचल गोष्टीशी जोडून घेऊन मन स्थैर्य अनुभवू शकणार नाही. खंडित गोष्टींना चिकटून अखंड सुख भोगू शकणार नाही. मनाला जर शाश्वत समाधान हवं असेल तर शाश्वताशीच चिकटून ते मिळू शकेल. केवळ भगवंतच शाश्वत आहे. त्यालाच मन चिकटलं तरच ते खरं शाश्वत, अखंड समाधान अनुभवू शकेल. नव्हे, त्या समाधानानं अखंड व्याप्त होईल. पण पैशानंच हे समाधान लाभेल, असा भ्रम माझ्यात असतो आणि तो तोडण्यासाठीच मग श्रीमहाराजांना पैशावर हल्ला चढवावा लागतो, त्याचे वास्तविक स्वरूप आणि त्याची कुरूप बाजूही दाखवावी लागते. म्हणूनच श्रीमहाराज सांगतात, ‘‘पैशाशिवाय चालत नाही पण पैशाइतकी वाईट वस्तू नाही. पैशाची आसक्ती नसावी. पैशाने मी सुखी होईन ही कल्पना नसावी. पैशाने मला मोठेपण आणि कीर्ति मिळाली असे वाटू नये.’’ पैशाइतकी वाईट वस्तू नाही! का? एकदा प्रमाणाबाहेर पैशाचा ओघ येऊ लागला तर तुमच्याशी होणारा लोकांचा व्यवहार हा पैसाकेंद्रित होतो. लोकांचे तुमच्याशी असलेले वागणे हे त्या पैशाच्या प्रभावापायी अनावश्यक अदबीचे, अनावश्यक सलगीचे, अनावश्यक कृत्रिमतेचे होऊ लागते. जगण्यातील वास्तवाशी असलेला संबंध तुटतो आणि तुम्ही म्हणता त्यालाच वजन येऊ लागते. मग आपण जे बोलू, जे करू, जे म्हणू तेच खरे, असा भ्रमही मनात उपजू लागतो. मग पैशानं आपण अलगद जेरबंद कधी आणि कसे होऊन जातो, ते कळतही नाही.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2013 रोजी प्रकाशित
८८. गुलाम
श्रीगोंदवलेकर महाराज श्रीमंतीची व्याख्या समाधानावर आधारित करतात आणि पुढे सांगतात की, ‘‘देहाला सुख देऊन मनाला सुख येणार नाही. समाधान मनाचा धर्म आहे. मन भगवंताशी चिकटले तर समाधान येईल.’’ आपण पैसा मिळवतो आणि त्यातून देहकष्ट कमी करणारी आणि देहाला सुख देणारी साधनं विकत घेतो. आपण असं मानतो की माझा देह सुखी झाला, माझ्या देहाला सुख मिळालं की मन सुखी होईल.
First published on: 06-05-2013 at 12:33 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 88 slave