दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्याविषयीच्या प्रतिक्रिया पाश्चिमात्य माध्यमांमध्ये उमटणे हे साहजिक आहे. भारतीय निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. नवीन सहस्रकात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे नाव घेतले जाऊ लागले. अजस्र बाजारपेठ, कौशल्यक्षम कामगार आणि उच्च शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा उद्भवदेश असे काही घटक भारताविषयी उत्सुकता वाढवणारे ठरले आहेत. ८०-९० कोटी मतदार आणि त्यांना मतदान करता यावे यासाठी एका प्रचंड देशामध्ये निवडणूक यंत्रणा कामाला लागते ही बाब पाश्चिमात्य लोकशाही देशातील बहुतांना आजही मोलाची वाटते. अशा वेळी राजधानी क्षेत्राच्या भाजपविरोधी आघाडीतील मुख्यमंत्र्याला अटक होते, त्या वेळी त्याचीही दखल घेतली जाणारच. प्रथम जर्मनी आणि आता अमेरिका यांच्या परराष्ट्र प्रवक्त्यांनी केजरीवाल यांच्या प्रकरणाची सुनावणी कायद्याची बूज राखून केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली, त्याकडे फार तर आपण दुर्लक्ष करणेच इष्ट. पण या दोन्ही देशांच्या भारतातील दूतावासांमधील प्रतिनिधींना आपण पाचारण केले आणि समज दिली. याची खरे तर काही गरज नव्हती. अमेरिकेतील निवडणूक प्रक्रिया, जर्मनीमधील निवडणूक यंत्रणा पूर्णतया निर्दोष आहेत, असे कोणीच म्हणणार नाही. त्याविषयी आपण टिप्पणी केली तर तशी करण्याचा आपला हक्क हे देश नाकारणार नाहीत. त्यामुळेच त्यांच्या काही विधानांविषयी केंद्र सरकारने इतके संवेदनशील राहण्याची गरज नाही. अमेरिकेच्या दूतावासातील अधिकारी ग्लोरिया बेर्बेना यांना पाचारण करताना परराष्ट्र खात्याने केलेली विधाने लक्षवेधक आहेत. राजनयिक परिप्रेक्ष्यात दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि अंतर्गत बाबींचा मान राखणे अभिप्रेत आहे. शिवाय संबंधित देश लोकशाहीप्रधान असल्यास याविषयीची खबरदारी अधिक आवश्यक ठरते. भारतातील न्यायपालिका स्वतंत्र असून, वस्तुनिष्ठ निकाल देण्यास कटिबद्ध आहे, असे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

हेही वाचा >>> चतु:सूत्र : नागरिकतेचा पैस

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After germany us reacts to arvind kejriwal s arrest zws
First published on: 28-03-2024 at 04:37 IST