१९४५-४७ सालच्या ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाचे नेतृत्व करणारे कॉम्रेड लहानू कोम यांच्या निधनामुळे झुंझार आदिवासी नेतृत्व हरपले आहे. ते कॉम्रेड शामराव परुळेकर आणि कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या तालमीत तयार झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील एक ध्येयनिष्ठ, अभ्यासू, लढाऊ व प्रतिभाशाली नेते होते.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी शोषित व वंचित बांधवांच्या हक्कासाठी आपले जीवन समर्पण करणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू शिवडा कोम (८७) याची सुमारे सात दशके आदिवासी बांधवांची सेवा तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची तलासरी, डहाणू, जव्हार भागात केलेली बांधणी दीर्घकाळ अभेद्या राहिली.
सुरुवातीलाच ते भूदान चळवळीत ओढले गेले. त्यावेळी विनोबा भावे, आचार्य भिसे या नेत्यांचा त्यांना सहवास लाभला. ऐन तारुण्यात १९५९ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रथम डहाणूनंतर १० वर्षं जव्हार व १९७७ नंतर तलासरी तालुक्यात पक्ष संघटना उभारणीसाठी योगदान दिले. त्यांनी १९६२ ते १९७७ दरम्यान जिल्हा परिषद सदस्यपद भूषविले. १९७७ मध्ये खासदार म्हणून निवडून झाल्यानंतर केंद्र सरकारच्या अनुसूचित जाती जमाती समितीचे अध्यक्षपद भूषविले. १९८० ते १९९५ दरम्यान जव्हार मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. आपल्या संघटन कौशल्यामुळे त्यांनी तलासरी पंचायत समितीवर ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लाल बावटा फडकत ठेवला.
कॉ. गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, बलराज सहानी यांनी स्थापन केलेल्या आदिवासी प्रगती मंडळ शिक्षण संस्थेचे ते १९६२ पासून वयाच्या २५ व्या वर्षीपासून संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेने वसतिगृहाची व्यवस्था करून आदिवासी तरुणांना शिक्षणाची दारे उघडून दिली. या शैक्षणिक संस्थेच्या डहाणू, तलासरी, वसा, उधवा, कोचाई आदी दुर्गम दुर्लक्षित आदिवासी भागात संस्था असून ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून त्यांनी आदिवासी समाजाला प्रगतीचा मार्ग खुला करून दिला. या संस्थेने १९९४ साली गोदावरी परुळेकर महाविद्यालयाची स्थापना करून उच्च शिक्षणाची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली. शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू ठेवण्यासाठी त्यांना अनेक दानशूर व्यक्तींची साथ लाभली.
कॉ. एल. बी. धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. सावकारांच्या विरोधातील आदिवासींच्या बंडात ते सहभागी झाले. आणीबाणीच्या काळात ते सक्रिय होते. याखेरीज सावकारी, महसुली, वन जमिनी, देवस्थान इनामे, आदिवासी बांधवांना मिळाव्यात म्हणून त्यांनी अनेक लढे दिले. अशा आंदोलनाच्या वेळी ते बऱ्याच वेळा भूमिगत राहिले, तसेच तुरुंगवास भोगला.
१९८३ मध्ये शेल्टी येथील आदिवासी हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईत काढलेल्या आदिवासी बांधवांच्या भव्य मोर्चात ते अग्रभागी होते. या प्रश्नावर तसेच आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविषयी ते विधानसभेत आक्रमकपणे बाजू मांडत.
अत्यंत साधी राहणी असलेला, गोरगरिबांचा कैवार असलेला कॉम्रेड लहानू कोम हा स्वाभिमानी, नि:स्वार्थी व नि:स्पृह आदिवासी योद्धा समाजाने गमावला आहे.