रचना बिष्ट रावत यांनी भारतीय सैनिकांच्या (१९७१ आणि त्याही आधीपासूनच्या) शौर्याबद्दल चार पुस्तकं लिहिल्यानंतर, भारताचे पहिले संयुक्त सेनादलप्रमुख जनरल बिपीनकुमार रावत यांचं चरित्र मेहनतपूर्वक लिहिलं. लेखिकेचं हेही पुस्तक ‘पेंग्विन’नं २०२३ मध्ये प्रकाशित केलं. लेखिकेच्या आडनावातही ‘रावत’ असलं तरी या चरित्रनायकाशी त्यांचं कोणतंही नातं नव्हतं. रावत यांच्या मुली, सिमल्याच्या सेंट एडवर्ड स्कूलमधले त्यांचे तत्कालीन सोबती, विविध पदांवरचे निवृत्त सेनाधिकारी, अशांना भेटून जणू प्रत्येकाच्या तोंडून आपण जन. रावत यांच्याबद्दल ऐकत आहोत अशा शैलीत हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. पुलवामा हल्ला त्यांच्या कारकीर्दीत झाला आणि ‘बालाकोट’चा बदलादेखील. पण तो घटनाक्रम कसकसा घडला आणि त्यात जन. रावत यांची भूमिका काय होती, यावर अजिबात भर न देता, ‘मॅन बिहाइण्ड द युनिफॉर्म’ या उप-शीर्षकाला पुस्तक जागतं.

‘बालाकोट एअर स्ट्राइक- हाउ इंडिया अॅव्हेन्ज्ड पुलवामा’ या पुस्तकाचे लेखक आहेत ‘नौदलाच्या ९७ च्या बॅचचे’ आणि आता पूर्णवेळ लेखन करणारे मन्नन भट. भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर लगेच, ९ मे रोजी भट यांनी आपल्या फेसबुक वॉलवर, २०२१ सालीच प्रकाशित झालेल्या ‘बालाकोट…’च्या मुखपृष्ठाचा फोटो पुन्हा लावला आणि लिहिलं…‘वॉर रूममध्ये नियोजन कसं केलं जातं हे जाणून घ्यायचंय? बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी केवढं बारकाईनं नियोजन केलं गेलं होतं, माहिती आहे? – मग तुमच्या हातात हे पुस्तक हवंच…’! लेखकाचा हा दावा खराही ठरतो, कारण बालाकोटमध्ये प्रतिहल्ला म्हणून कारवाई करण्याचा निर्णय, नियोजन आणि त्याचं श्रेय याबद्दल या पुस्तकात बराच मजकूर आहे. आपले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे मिग-२१ विमान कोसळूनही कसे वाचले, पाकिस्तानच्या ताब्यातून कसे सुखरूप भारतात आले, याची शौर्यगाथाही आहे… त्यामुळे विंग कमांडर अभिनंदन यांची प्रतिमा मुखपृष्ठावरही आहे. कोणाही बहुराष्ट्रीय प्रकाशन संस्थेनं बालाकोटसारख्या वीरश्रीपूर्ण विषयावर पुस्तक काढण्याची तातडी दाखवली नाही, हेही विशेषच… ‘गरुड प्रकाशन’ हे या पुस्तकाचे प्रकाशक असल्याने त्याबद्दलची जिज्ञासा बळावते. त्याचे संस्थापक संक्रांत साहू आणि अंकुर पाठक हे दोघेही आयआयटीयन असल्याचा, तसंच संक्रांत साहू हे ‘योग, क्रिया आणि ध्यान’ अशी ‘डेली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस’ करण्याच्या ‘भारतन ट्रॅडिशन्स’शी (‘भारतन’ हा शब्द ‘इंडियन’च्या ऐवजी आहे) सुपरिचित असल्याचा; तर अंकुर पाठक हे ‘आध्यात्मिक युयुत्सु (सीकर)’ आणि ‘ध्यान व प्राणायाम करणारे’ असल्याचा उल्लेख या प्रकाशनाच्या संकेतस्थळानं, या प्रत्येक संस्थापकाची ओळख फार तर १५० शब्दांत करून देतानासुद्धा आवर्जून केलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण या बालाकोटच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’चे खरे नायक होते ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद सांभाळणारे ‘सुपरकॉप’ अजित डोभाल, याचा पुरेपूर तपशील देणारं आणि त्यानिमित्ताने डोभाल यांच्या कारकीर्दीतले प्रमुख टप्पे आणि या टप्प्यांमधलं यश, त्या यशासाठी डोभाल यांच्या कारकीर्दीकडे पाहूनच मिळणारा ‘मंत्र’… हे सारं चटपटीतपणे मांडणारं पुस्तक महेश दत्त शर्मा यांनी लिहिलं आहे. ‘सुपरकॉप एनएसए अजित डोभाल – अॅन इन्स्पिरेशनल बायोग्राफी’- हे या पुस्तकाचं नावही साजेसं ठरण्याचं कारण, हे रूढार्थानं चरित्र अजिबात नसून, डोभाल यांच्याकडून नव भारतीय पिढीनं काय शिकलं पाहिजे, यावर या लिखाणाचा भर आहे. ‘टॉप इन्स्पायरिंग थॉट्स ऑफ… अशी पुस्तकमालिकाच शर्मा यांनी यापूर्वी संकलित/संपादित केली असून त्यात भगत सिंग, बराक ओबामा, अझीम प्रेमजी, बेंजामिन फ्रँकलिन असं वैविध्य आहे. अर्थात, २०२२ साली अजित डोभाल यांच्याविषयीचं हे पुस्तक लिहिल्यानंतर मात्र महेश दत्त शर्मा हे चरित्रलेखनाकडे वळले आणि ‘गौतम अदानी- अ कम्प्लीट बायोग्राफी’ हे पुस्तक २०२३ मध्ये प्रकाशित झालं.