योगेंद्र यादव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधकांनी जाणीवपूर्वक आणि मेहनतीने तयार केलेल्या पप्पू या प्रतिमेमधून राहुल गांधी तितक्याच मेहनतीने बाहेर पडले आहेत. या अंधकारमय काळात राजकारण करण्याचे आव्हान आता ते नाकारू शकत नाहीत..

या आठवडय़ात देशाने नवे राहुल गांधी पाहिले. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राफेल घोटाळय़ावर त्यांनी अत्यंत आक्रमक टीका केली होती. अदानी प्रकरणातील पंतप्रधानांच्या सहभागावरची नुकतीच त्यांनी केलेली टीका मात्र त्या टीकेच्या अगदीच विरुद्ध म्हणजे धारदार पण संयत होती. त्यांनी केलेले भाषण हा काही उत्कृष्ट वक्तृत्वाचा नमुना नव्हता. परंतु या प्रकरणातील तपशील, आपला पक्ष आणि जनता आपल्या पाठीशी आहे, या आत्मविश्वासातून त्यांनी सत्ताधारी पक्षातील टीकाकारांना अंगावर घेतले. दरबारी माध्यमांनी हा आंतरराष्ट्रीय घोटाळा दाबण्याचे कितीही प्रयत्न केले असले तरी, अदानी-मोदी यांचे संबंध असल्याचा आरोप पुढे बराच काळ सुरू राहणार आहेत हे स्पष्ट आहे.

हे नवे राहुल गांधी मी आधीच पाहिले होते, ३० जानेवारी २०२३ रोजी, भारत जोडो यात्रेच्या समारोप सोहळय़ात. ‘‘शेवटच्या जाहीर सभेदरम्यान पाऊस किंवा बर्फ पडण्याची ९० टक्के शक्यता आहे,’’ राहुल गांधींचे निकटवर्तीय बिजू यांनी मला काही दिवस आधीच ही माहिती दिली होती. आणि हा अंदाज अगदी बरोबर होता. श्रीनगरमध्ये हाडे गोठवणारी थंडी होती. पहाटेपासूनच जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली होती. आम्ही बर्फ, गाळ आणि चिखलातून चालत स्टेडियममधील पोडियमवर पोहोचलो. सभा सुरू झाली तसतसा बर्फ वेगाने भुरभुरू लागला.

पाय गोठवणाऱ्या पाण्यात भिजून माझे स्नोशूज कामातून गेले होते. माझा नवीन फॅन्सी कोट निरुपयोगी ठरला होता. समोरचे व्यासपीठ आच्छादलेले नव्हते. लोक उघडय़ावर थांबणार असतील तर नेत्यांसाठीही तशीच व्यवस्था असावी असे राहुल गांधींनी फर्मान काढले होते. सभेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या शेकडो लोकांपैकी बहुतेकांनी चांगल्या छत्र्या आणल्या होत्या. त्यातले अनेक जण काश्मीरमधला हिमवर्षांव पहिल्यांदाच अनुभवत होते. वक्त्यांची संख्या कमी करण्याच्या सूचना राहुल गांधींनी फेटाळून लावल्या. त्यांची बोलण्याची वेळ येईपर्यंत तासभर उलटून गेला होता.

व्यासपीठावर उभे राहिल्यावर त्यांनी पहिली गोष्ट केली, ती म्हणजे वक्त्यासाठी छत्री घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीला तिथून घालवून दिले. आणि मग ते शांतपणे, पुढची ४० मिनिटे बोलले. नुकत्याच संपलेल्या यात्रेचा उद्देश त्यांनी सांगितला. यात्रेमुळे आपला अहंकार कसा कमी झाला, आपल्या शारीरिक तंदुरुस्तीचा त्यांना कसा अभिमान वाटत होता आणि एका तरुण मुलीच्या पत्राने त्यांना पुढे जाण्याचे बळ कसे दिले याबद्दल त्यांनी सांगितले. काश्मिरी फिरेन आणि वूलन टोपी घालून ते बोलत होते, त्यांच्या टी-शर्टवरून झालेल्या चर्चेबद्दल. रस्त्यावर भेटलेल्या तीन मुलांनी त्यांना थंडीचा सामना कसा करायचा हे सांगितलं याबद्दल. त्यांच्या कुटुंबाचे काश्मीरशी असलेले नाते, काश्मिरी आध्यात्मिक परंपरा आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्रात कशी मिसळून गेली आहे याबद्दल..

मग त्यांनी आपल्या खिशातून फोन काढला आणि त्या फोनवर एके काळी आलेल्या कॉलचा त्यांच्या आयुष्यात काय अर्थ आहे हे सांगितले. त्यात कुठलेही अतिनाटय़  नव्हते, आवाजाची पट्टी वाढवणे किंवा नाटय़मयरीत्या कमी करणे नव्हते. त्यांच्या भाषणात वक्तृत्वाची भरमार नव्हती. राजकीय डावपेच नव्हते, विरोधकांवर हल्ले नव्हते, कसलीही भलतीच हुशारी नव्हती. यात्रेनंतरच्या कृती आराखडय़ाबाबत अनेक घोषणा असतील असे आम्हाला वाटत होते. पण तसे काहीच नव्हते.

त्या कडाक्याच्या थंडीच्या दिवशी, राहुल गांधींनी काही तरी अत्यंत साधे आणि उबदार देऊ केले जे खोऱ्यातील आणि बाहेरील प्रत्येक भारतीय आपल्या मनात कायम जपून ठेवेल. भारत काय होता आणि आजही काय असू शकतो याचे दर्शन त्यांच्या बोलण्यातून झाले. त्यांनी जे सांगितले ते केवळ आंतरिक शांती आणि स्पष्टतेतून येऊ शकते. त्यांनी अंत:करणाच्या शुद्धतेतूनच निर्माण होणारी कळकळ व्यक्त केली. त्यांच्या बोलण्यात अतिशय खोल संकल्प होता. ३७०० किमी लांबीच्या यात्रेच्या शेवटी त्यांनी जे भाषण करावे अशी मला अपेक्षा होती तसे ते भाषण नव्हते. तरीही ते इतर कुणीही लिहून दिलेल्या भाषणापेक्षा निखालस चांगले होते.

माझ्यासाठी तो राहुल गांधींच्या आगमनाचा क्षण होता. गंमत म्हणजे, पप्पू ही राहुल गांधींची याआधी तयार केलेली प्रतिमा आता त्यांचे सर्वात मोठे बलस्थान ठरली आहे. पप्पू या त्यांच्या तयार केल्या गेलेल्या प्रतिमेतून ते पूर्णपणे बाहेर पडले आहेत. पप्पू हा दिल्लीमधला टिपिकल तरुण होता जो रस्त्यावरच्या उन्हात, धुळीत चालण्यासाठी बाहेर पडत नव्हता. पहिल्या काही दिवसांत दररोज २५ किमी चालणे ही गोष्ट ही आधीची प्रतिमा चिरडून टाकण्यासाठी पुरेसे होते. बहुचर्चित आयटी सेलकडे राहुल गांधी प्रत्यक्षात चालत नाहीत या पातळीवरचे खोटे बोलण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. पप्पू या प्रतिमेमधला आत्ममग्न माणूस कुणाशीच बोलायचा नाही. पण राहुल गांधी यांचे लोकांचे हात हातात घेतलेले, सर्वाशी बोलतानाचे आणि मिठी मारल्याचे फोटो आणि व्हिडीओ आले. त्यांनी सगळा खोटेपणा जमीनदोस्त केला. पप्पू या मूर्ख माणसाला आपल्या देशाबद्दल आणि इथल्या लोकांबद्दल काहीच माहीत नव्हते. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना भेटलेल्या शेकडो कार्यकर्ते आणि विचारवंतांना तसे काहीच जाणवले नाही. राहुल गांधींच्या बौद्धिक गहनतेने जवळजवळ प्रत्येक जण थक्क झाला होता.

अखेर खरे राहुल गांधी त्यांच्याबद्दलच्या पसरवल्या गेलेल्या प्रतिमेमधून बाहेर पडले आहेत. हा माणूस धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि आर्थिक समानता या घटनात्मक आदर्शावर मनापासून विश्वास ठेवणारा माणूस आहे. तो देश आणि जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर चिंतन करणारा फक्त माणूस नाही, तर आरशातून आत स्वत:कडे वळून बघणारे चिंतनशील मन त्यांच्याकडे आहे. हा असा एक नेता आहे, जो द्वेषावर मात करण्यासाठी कठोर परिश्रम करतो आणि करुणा बाळगतो. तो सत्तेची भूक नसलेला राजकारणी आहे. नाटकीपणा आणि खोटेपणा टाळणारा साधा सरळ माणूस आहे. तरीही यातील प्रत्येक गुणाला दुसरी बाजूही आहे. एखाद्याच्या दृढनिश्चयाचे हट्टीपणात रूपांतर होऊ शकते. दृष्टिकोन काल्पनिक किंवा अव्यवहारी ठरू शकतो.   तपस्या करणारा अहंकारी होऊ शकतो. सत्तेची आकांक्षा नसणे हे सत्ताकांक्षेची इच्छाच नसणे ठरू शकतो. हे नैतिक राजकारणापुढचे आव्हान आहे.

नैतिकतेला राजकीयदृष्टय़ा व्यवहार्य बनवण्याचा मार्ग नसल्यास, एखादा दूरदर्शी नेता राजकीय वास्तव जगापासून दूर जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. काँग्रेस नेते, काँग्रेस कार्यकर्ते आणि भारतातील जनतेला अपेक्षित असलेली मूल्ये आणि आपली दृष्टी यांचा ताळमेळ साधण्याचे आव्हान राहुल गांधींसमोर आहे. सत्तेची भूक नसणे हा सद्गुण आहे, पण योग्य कारणासाठी सत्ताकांक्षा नसणे म्हणजे जबाबदारीचा त्याग करणे होय. स्वत:च्या पक्षात नव्याने मिळवलेल्या उंचीचा वापर करून पक्षाला एक कार्यक्षम निवडणूक यंत्र म्हणून आकार देण्याचे आणि विजयाकडे नेण्याचे आव्हान राहुल गांधींसमोर आहे. जनतेला आकर्षित करण्यासाठी खोटे बोलणे आवश्यक असते असा विश्वास असलेल्या जगात, लोकांच्या हृदयाला भिडणाऱ्या मार्गाने सत्य सांगण्याचे आव्हान राहुल गांधींसमोर आहे.

राजकारण म्हणजे सद्गुणांचा झेंडा धरून चालणे नाही; तर आपण राहतो त्या खऱ्या, अस्ताव्यस्त जगात त्या सद्गुणांची जाणीव करून देणे म्हणजे राजकारण. हे केवळ राहुल गांधी किंवा काँग्रेससारख्या विरोधी पक्षांसाठी नाही, तर भारतीय प्रजासत्ताकासाठी उभ्या असलेल्या प्रत्येकासाठी आव्हान आहे. देशाने या नवीन राहुल गांधींना प्रेमाने आिलगन दिल्याने, या अंधकारमय काळात राजकारण करण्याचे आव्हान आता ते नाकारू शकत नाहीत.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deshkal rahul gandhi prime minister adani case of criticism speech excellent eloquence ysh
First published on: 10-02-2023 at 00:03 IST