‘माझ्या कलावस्तूची मर्यादा मी स्वत: आखून घेतो. ती इतरांना ठरवू देत नाही. संस्कृतीच्या बाजारीकरणात हेराफेरी करणाऱ्या यंत्रणेचा मी भाग नाही…’ स्वत:च्या लेखननिष्ठेसंबंधी ही लखलखीत भूमिका ‘एमटी’ यांना असाधारण असं स्थान मिळवून देणारी आहे.
कुडल्लूर हे केरळातलं एक छोटं खेडं. त्याकाळी कोणत्याही दळणवळणाच्या सुविधा नसलेलं. गावापासून सहा मैलाच्या अंतरावर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर जायचं तर नदी ओलांडून सात मैल चालावं लागायचं. ‘एमटी’ यांचा जन्म झाला एका छोटय़ा शेतकरी कुटुंबात. घासलेटवरच्या चिमणीच्या उजेडात हा पोरगा काय लिहितोय हे घरच्यांनाही कळण्याची सोय नव्हती. गावात शिक्षणाबद्दलही फारशी जागृती नाही. महाकवी एजुथाचन यांनी लिहिलेलं रामायण न अडखळता वाचता यायला लागलं की शिक्षण पुरे झालं असं गावातले लोक मानायचे. बांधाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या भातशेतात गुरं ढोरं घुसू न देता ती आवरण्याइतकं बळ अंगात आलं की घरचे लोक अशा मुलांना लगेच शेतकामात मदतीसाठी जुंपत. ‘एमटी’ यांचा जन्म अशाच एका कुटुंबातला. मडत थेकेपट्ट? वासुदेवन नायर असं लांबलचक नाव असलं तरी ‘एमटी’ याच नावाने ते ओळखले जायचे. घरात आईच्या तोंडून बालपणी ऐकलेल्या गोष्टी मनात पक्क्या रुतून बसलेल्या. त्या गोष्टींची लय खोलवर भिनलेली. तीच लय पुढे कागदावर उतरली. कदाचित अगदी सुरुवातीला कविता लिहिल्याचाही परिणाम असेल पण ‘एमटी’ यांच्या कथेला एक लय आहे. त्यांच्या सगळय़ाच कथांमध्ये दृश्यात्मकता आहे. त्यातूनच सिनेमा या माध्यमानं त्यांना आकर्षित केलं असावं.
‘एमटी’ यांनी पन्नासहून अधिक पटकथा लिहिलेल्या आहेत आणि सहा सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. पटकथा लेखनासाठी त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, एवढी त्यांची या प्रकारावरील हुकूमत आहे. ‘नालूकेट्ट?’ ही त्यांची पहिली कादंबरी जेव्हा त्यांनी लिहिली तेव्हा ते केवळ पंचविशीत होते. त्यानंतर एका दशकाने त्यांची ‘कालम्’ ही कादंबरी आली. तिला १९७१ यावर्षी साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं होतं. सिनेमाच्या क्षेत्रात ते पहिल्यांदा आले ते ‘निर्माल्यम्’ या सिनेमाच्या निमित्ताने. त्यांच्याच एका कथेवर आधारित असलेला हा चित्रपट आहे. तो तयार करायचा तर जवळ पैसे नाहीत. काही मित्रांनी मदत केली. हाताशी असलेल्या मर्यादित साधनांच्या आधारे त्यांनी हा चित्रपट तयार केला. त्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. ‘एमटी’ तसे विज्ञान शाखेचे पदवीधर पण पुढे साहित्य हाच त्यांचा श्वास झाला.‘मातृभूमी’ या मल्याळममधील प्रसिद्ध नियतकालिकाचे संपादक म्हणून ते दीर्घकाळ कार्यरत होते. या भाषेतल्या अनेक लिहित्या लेखकांच्या पिढय़ा त्यांनी घडवल्या.
एकाच वेळी कथा आणि पटकथा लिहिणाऱ्या ‘एमटी’ यांना जेव्हा विचारलं जातं, तुम्ही कोणतं माध्यम महत्त्वाचं मानता. तेव्हा साहित्य हे सिनेमापेक्षा महत्त्वाचं आहे असं त्यांचं उत्तर असतं. चित्रपट ही सांघिक कृती आहे. कथालेखन ही एकट्यानं करण्याची गोष्ट आहे. दोन्ही माध्यमं वेगळी आहेत आणि सिनेमाचा चाहता वर्ग हा मोठा आहे याचीही जाणीव त्यांना होतीच. ‘एमटी’ यांच्या कथेतली पात्रं ही साधीसुधी आहेत. ती फार विचारी वगैरे नाहीत. जिवंत हाडामांसाची आणि आपल्या अवतीभवती वावरणारी अनेक माणसे त्यांच्या कथांमधून दिसून येतात. या कथांमध्ये नायक असोत अथवा नायिका, त्यांचा स्वत:शीच संघर्ष चाललेला असतो. या पात्रांचा अस्तित्वशोध हेच ‘एमटी’ यांच्या लेखनाचं सूत्र आहे. विशेषत: केरळातलं लोकजीवन हा ‘एमटी’ यांच्या साहित्याचा गाभा आहे. त्यांच्याही आधी वायकोम मोहम्मद बशीर या लेखकाने हे जीवन साहित्यात खूपच उत्कटतेने आणलं होतं.
‘एमटी’ यांनी एका मोठ्या पटावर या जीवनातले प्रेम, पराभूतता आणि एकाकीपण अशा अनेक गोष्टींचे रंग भरले. स्थानिक म्हणी, वाक्प्रचार यांनी युक्त असलेल्या त्यांच्या भाषेने कथेला अधिक संवादी केले. केरळातल्या मातृसत्ताक कौटुंबिक जीवनाचे अनेक स्तर या कथेने उलगडले. ऐन उमेदवारीच्या काळात ‘द न्यूयॉर्क हेराल्ड ट्रिब्यून’च्या जागतिक कथास्पर्धेत त्यांच्या कथेला पारितोषिक मिळालं होतं. इथून त्यांच्या कथालेखनाला सुरुवात झाली. पुस्तकातली कथा आणि पडद्यावरची कथा या दोन्ही गोष्टींचा मेळ ते आयुष्यभर साधत राहिले. सिनेमाच्या वलयाने त्यांच्यातल्या वृत्तस्थ लेखकाला विचलित होऊ दिले नाही.
त्यांच्या म्हणण्यानुसार लिहिणं म्हणजेच शब्दाशी खेळणं आणि या खेळाचा छंद ‘एमटी’ यांना शालेय जीवनापासूनच जडला. कारण त्यात आणखी कोणाची गरज भासत नसे. एकट्यानेच खेळायचा हा खेळ शाळेच्या सुट्ट्यांमध्ये आणि जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हा त्यांच्याकडून खेळला जाऊ लागला. कालांतराने लिहिणे ही दररोजचीच गोष्ट होऊन बसली. लेखकाच्याही काही अवस्था असतात. सुरुवातीचा उमेदवारीच्या काळातला उत्साह, संपादकांकडून कथेची मागणी झाल्यानंतर झटपट कथा लिहून देणं, त्यानंतर येणारं जबाबदारीचं दडपण, नाव झाल्यानंतर अनेक सबबीखाली नकार देणं, कधी स्वत:चीच समजूत करून घेणं, तीव्र उन्हाळ्याच्या दिवसात आता हे तापमानाचे दिवस संपून जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा लिहू असं वाटणं, पावसाळ्यात कोंदटलेल्या वातावरणात आता जेव्हा वातावरण प्रसन्न होईल त्या दिवसात लिहू असं लांबणीवर टाकणं… अशा कैक सबबी. लेखकाला संभ्रमित करणाऱ्याही अनेक गोष्टी असतातच. कधी कधी वाटतं एकांतात दूर कुठेतरी निघून जावं आणि त्याचवेळी नित्याच्या गजबजाटातही शिरावं असंही वाटत राहतं. ही दोन्ही वर्तुळं अनेकदा परस्परांना छेदत राहतात. या सगळ्या अवस्था ‘एमटी’ यांनी आपल्या एका मनोगतात व्यक्त केल्या आहेत.
१९९६ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. देशातले अन्यही महत्त्वाचे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. जागतिक पातळीवरील अनेक साहित्यिक उपक्रमात ते सहभागी होत राहिले. या साऱ्या लौकिक यशानंतरही लिहिण्याविषयी ते कायम सजगच राहिले. साहित्य अकादमीने ‘महत्तर सदस्यता’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान केल्यानंतर त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या लेखकासाठी महत्त्वाच्या आहेत. ‘प्रत्येक लेखकाला अनेक वेळा एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. तुम्ही का लिहिता ? मला अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. मला वाटतं की मी जीवनात वेदना, आनंद, भीती, स्वप्नं आणि भ्रमांविषयी जरा अधिक संवेदनशील आहे. मी मानवी परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रक्रियेत मी स्वत:ला पुन्हा पुन्हा शोधत राहतो. जर मी माझे ताण माझ्या काही समानधर्मी मित्रांसोबत वाटू शकलो नाही तर मला अपराधी वाटतं. माझ्या कलावस्तूची मर्यादा मी स्वत: आखून घेतो. ती इतरांना ठरवू देत नाही. संस्कृतीच्या बाजारीकरणात हेराफेरी करणाऱ्या यंत्रणेचा मी भाग नाही… आणि म्हणून मोठ्या लौकिक यशाच्या आकांक्षाही मी बाळगू शकत नाही.’ स्वत:च्या लेखननिष्ठेसंबंधी असलेली ही लखलखीत भूमिका ‘एमटी’ यांना असाधारण असं स्थान मिळवून देणारी आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं.
एवढं सगळं लिहून झाल्यानंतर कुठल्याही लेखकात एक सराईतपणा येतो. शब्दांचा संचय आणि थोडी कारागिरी या आधारे चमकदार लिहिणं फारसं कठीण नाही पण ‘एमटी’ इथं अपवाद आहेत. नवं लिहिणं हे प्रत्येक वेळी आव्हानच असतं. अधिरतेबरोबरच या आव्हानाचाही लिहिणाऱ्यावर दाब असतो. ‘‘अनेक दशकांपासून लिहितोय… तर आजही नव्याने काही लिहायला हाती घेतो तेव्हा परीक्षा हॉलमध्ये असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यासारखा मी दडपणाखाली असतो.’’ हे विधान त्यांच्या सराईत नसण्याची साक्ष म्हणून देता येईल.
लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत.
aasaramlomte@gmail.com