‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत’ हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा भाषणसंग्रह आहे. १९७२ मध्ये प्रकाशित हा ग्रंथ व्हीनस प्रकाशन या संस्थेच्या रौप्य महोत्सवी व्याख्यानमालेत दिलेल्या भाषणांमधून साकारला आहे. १९७१ मध्ये तर्कतीर्थांनी या ज्ञानसत्रात तीन भाषणे दिली होती- १) मराठी साहित्य समीक्षेची प्रभात, २) संगम व पृथक् प्रस्थान, ३) आधुनिकांची रसचर्चा.

तर्कतीर्थ एकदा प्रा. बा. सी. मर्ढेकर यांचे ‘साहित्य आणि सौंदर्यशास्त्र’ हे पुस्तक वाचत होते. त्याच्या प्रास्ताविकामध्ये वाक्य आहे की, ‘भारतीय साहित्यशास्त्राच्या भोवती मराठी समीक्षा घोटाळत राहिली आहे.’ खरे तर सर्वच भारतीय भाषांच्या समीक्षेचा आपण विचार करू लागलो, तर असे लक्षात येते की, आपले समीक्षाशास्त्र मूलत: संस्कृत काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, रससिद्धांत या संकल्पनांवर उभे राहिलेले आहे. मराठीत गद्याशैलीचा आविर्भाव झाल्यानंतरच समीक्षेचा व्यापक विचार सुरू झाला. तत्पूर्वीची समीक्षा काव्य मर्यादेत होती. कारण, काव्य म्हणजेच साहित्य, असे साहित्याचे सीमित रूप होते. गद्याशैली विकासानंतर कथा, कादंबरी, नाटक, निबंध, आत्मकथा आणि प्रवासवर्णनादी साहित्य प्रकार विकसित झाले, त्यामुळे रसविचाराची नवी मांडणी तर्कतीर्थांना करणे अनिवार्य वाटले. तर्कतीर्थांनी मराठीतील रसविचारसंबंधी सर्वश्री गंगाधर गाडगीळ, द. के. केळकर, डॉ. के. ना. वाटवे प्रभृतींचे रससिद्धांत, काव्यालोचन, रसविमर्शविषयक ग्रंथ वाचले होते. त्यातील शंका, आक्षेप, मीमांसा इत्यादींवर नवा विचार व्यक्त करण्याच्या इराद्याने हे विषय निवडले होते.

‘मराठी साहित्य समीक्षेची प्रभात’ या व्याख्यानात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, १८२० ते १९७० या दीडशे वर्षांच्या कालखंडात मराठीत जे आधुनिक साहित्य निर्माण झाले, ते मराठी समीक्षा उदयाचे (उगमाचे) कारण होय. साहित्य आणि समीक्षा यांचा संबंध सुवर्ण आणि सुगंधासारखा अद्वैत बनविण्याचे कार्य चिपळूणकरांनी केले. संस्कृत व इंग्रजी भाषा अभ्यासाचा समन्वय मराठी भाषेच्या समीक्षेचा पाया ठरल्याने तिचा विकासपट अल्पावधीत विस्तारला.

‘संगम आणि पृथक् प्रस्थान’ भाषणातून तर्कतीर्थांनी सांगितले आहे की, १९व्या शतकाच्या मध्यात मराठी समीक्षेत दिशांतर घडून आले. परंपरागत समीक्षेस छेद देत प्रा. ना. सी. फडके, कुसुमावती देशपांडे, मं. वि. राजाध्यक्ष, प्रा. बा. सी. मर्ढेकर, प्रा. वा. ल. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, श्री. के. क्षीरसागर, दि. के. बेडेकर, माधव आचवल, प्रभाकर पाध्ये, वसंत दावतर प्रभृतींनी पाश्चात्त्य साहित्यशास्त्र प्रमाण मानून मराठी नवसमीक्षेचा सर्जक असा पृथक् मार्ग प्रशस्त केला. मराठी साहित्यात नवसर्जक साहित्याचा लोंढा इतका मोठा होता की, त्या रेट्याने अनुकरणाऐवजी नवता, भाषांतराऐवजी मौलिक सृजन आवश्यक बनले. त्यामुळे मराठी समीक्षेसाठी पृथक् मार्ग अंगीकारणे अनिवार्य झाले. या संधिकालीन मराठी साहित्यास महात्मतेची मोहिनी पडणे स्वाभाविक होते. परिणामी, मराठी समीक्षा पाश्चात्त्य तोंडावळ्याची बनली.

‘आधुनिकांची रसचर्चा’ हे अंतिम व्याख्यान समीक्षेवरील नवआक्षेपक प्रा. नरहर कुरुंदकर, दि. के. बेडेकर यांच्या मतांचे खंडन करणारे असले, तरी ते ‘रससिद्धांत’विषयक पारंपरिक संस्कृत मीमांसेस नवे परिमाण देणाऱ्या आधुनिक रसचर्चेचे समर्थक ठरल्याने या भाषणास रसचर्चेची संशोधनपूर्ण नवी मांडणी करणारे म्हणून स्वीकारले जाणे, हे तर्कतीर्थांच्या पौर्वात्य व पाश्चिमात्य समीक्षेवरील समानाधिकारामळेच शक्य झालेे.

तर्कतीर्थ लिखित सर्व ग्रंथांच्या या विहंगमावलोकनातून लक्षात येते की, त्यांची प्रज्ञा व प्रतिभा सर्व ज्ञानविज्ञान संचारी होती, तशीच सर्व विचार, व्याकरण, शैली, भाषा इत्यादींच्या मूळ अभ्यासातून विकसित झाली असल्याने तिची मांडणी नेहमी स्वतंत्र विचारांची आहे. भरतमुनींइतकेच तर्कतीर्थांना टी. एस. इलियटच्या समीक्षेचे आकर्षण होते. ते मूलत: साहित्य तत्त्वांच्या अभ्यासावर उभे होते. प्राचीन काव्यशास्त्र, नाट्यशास्त्राइतकीच तर्कतीर्थांना आधुनिक भाषाशास्त्र, शैलीशास्त्र, इत्यादींचे आकर्षण होते.

डॉ. सुनीलकुमार लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com