शहरी गोंगाट आणि गजबजाटापासून दूर कुठे तरी निवांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचे माणसे ठरवतात. मनाला विरंगुळा मिळावा म्हणून निर्जन अशा जागा त्यासाठी खुणावत असतात. तिथे गेल्यानंतरही काही वृत्ती, प्रवृत्ती उफाळून येतातच. आनंद ही अनुभवण्याची नाही तर उपभोगण्याची गोष्ट आहे असाच अनेकांचा समज असल्याकारणाने त्या जागेची शांतता घालवण्यापासून ते तिथे अस्वच्छता करण्यापर्यंत अनेक गोष्टी माणसांच्या हातून घडतातच. मग तो ‘येणे सुखे रुचे एकांताचा वास’ उरत नाही.
सुनील गंगोपाध्याय यांच्या ‘अरण्येर दिन रात्री’ या कादंबरीवर सत्यजित रे यांचा त्याच नावाचा सिनेमा आहे. बिहारमधल्या पलामु या घनगर्द जंगलात काही दिवस घालवण्यासाठी असीम, हरी, संजय आणि शेखर हे चार मित्र कोलकात्याहून जातात. खरं तर असं कुठे निश्चित ठिकाण ठरवून जायचं हे त्यांनी ठरवलेलंही नसतं, पण या परिसरात आल्यानंतर त्यांना इथंच थांबावं वाटतं. आरक्षण न करता जंगलातल्या डाक बंगल्यात चौकीदाराला चिरीमिरी देऊन कक्ष बळकावण्यापासून ते मद्याधुंद अवस्थेत जंगलातल्या वाटांवर गाडी थांबवून नाचगाणी आणि धुडगूस घालण्यापर्यंत या सर्वांचे उद्याोग चाललेले असतात. जंगलात तिथं अगोदरच आलेलं आणखी एक कुटुंब आहे. या कुटुंबाशी या चौघांचा होणारा संवाद, तिथल्या आदिवासींशी येणारा संपर्क यातून चित्रपटाचं कथानक उलगडत जातं. या चार मित्रांना शहरी गोंगाटापासून पूर्णपणे अलिप्त असे काही दिवस घालवायचे आहेत. त्याच त्या दैनंदिन घटना- घडामोडींचा उबग नको म्हणून या कोलाहली पर्यावरणापासून स्वत:ला तोडण्यासाठी ते प्रतीकात्मकरीत्या वर्तमानपत्राचे दहन करतात. या चौघांची भेट जंगलात ज्या कुटुंबाशी झालेली आहे त्यात शर्मिला टागोर (अपर्णा), कावेरी बोस (जया) या दोघी आहेत. जंगलात आल्यानंतर दाढी वगैरे करायची नाही असं ठरवणारा शेखर या दोघींना पाहिल्यानंतर आपल्या निर्धारापासून ढळतो. या चौघांमधलाच एक असीम हा अपर्णा या व्यक्तिरेखेकडे आकर्षित होतो, पण बुद्धिमान असलेल्या तिच्याशी याचे सूर जुळत नाहीत. संजय हा विधवा असलेल्या जयाकडे आकर्षित होतो. स्वत:च्या कौटुंबिक असमाधानातून जयाला आधीचंच एक रितेपण आलेलं आहे. यातला हरी एका संथाली आदिवासी मुलीला जाळ्यात ओढतो. सिनेमात असे अनेक प्रसंग आहेत जे मध्यमवर्गीय नैतिकतेपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. या चौघांच्या असंवेदनशील, बेपर्वा अशा वर्तनाचा प्रत्यय काही प्रसंगांमधून येतो. जंगलातल्या त्या डाक बंगल्यावरच्या चौकीदाराची बायको अतिशय आजारी असते, तो बिचारा तशाही परिस्थितीत या चौघांची कामं करत असतो. ही कामं करणं म्हणजे त्याचं कर्तव्यच आहे अशा भावनेतून अत्यंत असंवेदनशीलतेने हे त्याच्याशी वागतात. विशेषत: सिनेमातल्या पुरुष व्यक्तिरेखांचा स्वभाव यानिमित्ताने कळून येतो. समाजजीवनातील आणि कौटुंबिक नात्यातले पेच कळून येतात. ५० वर्षं होऊन गेली तरी हा सिनेमा आजही समकालीन वाटावा असाच आहे. (योगायोगाचा भाग म्हणजे याच वर्षी दिनांक १३ मेपासून सुरू झालेल्या कान्स चित्रपट महोत्सवात तो दाखवला जाणार आहे.) जंगलात चार-दोन दिवस घालवतानाही यातली प्रत्येक व्यक्तिरेखा ही कुठल्या ना कुठल्या न्यूनगंडाने कुरतडल्यासारखी वाटते. जंगलात स्वच्छंदी जगायचंय, पण प्रत्येकाच्या भोवती कुठली ना कुठली वर्तुळं आहेत. यातल्या चौघांचेही स्वभाव भिन्न आहेत आणि ते जणू आपल्या नागर समाजाचेच प्रतिनिधित्व करतात. शेवटी घाईघाईतली ही जंगलातली सहल उरकून ते पुन्हा आपल्या शहरात परतायला निघतात. तुम्ही कुठेही गेलात तरी व्यक्ती म्हणून सुटे नसता. तुमचे पूर्वग्रह, तुमच्या धारणा, समज- गैरसमज या सगळ्यांनी मिळूनच तुमचं व्यक्तिमत्त्व वावरत असतं. मग तुम्ही जनात असा की वनात… हे सांगणारा हा चित्रपट आहे.
जंगलं वाचवा, त्यावरील अनधिकृत अतिक्रमणांना थोपवा, नैसर्गिक संपत्तीची धूळधाण थांबवा, तिथल्या जैवविविधतेचं रक्षण करा, पशु-पक्ष्यांचा, प्राण्यांचा अधिवास जपा, वनजमिनी कोणाच्या तरी घशात घालणं थांबवा, अशा बाबी रोजच कानावर पडतात आणि त्यांना छेद देणाऱ्या घटनाही रोजच पाहायला, ऐकायला, वाचायला मिळतात. विभूतीभूषण बंदोपाध्याय यांची ‘आरण्यक’ ही कादंबरी बंगाली भाषेत सात-आठ दशकांपूर्वी प्रसिद्ध झाली. याच नावाने तिचा मराठी अनुवाद शंकर बाळाजी शास्त्री यांनी केला आहे. अनुवाद शब्दबंबाळ असला तरी कादंबरीचा आशय वाचकांपर्यंत पोहोचतो. पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेला एक नायक अपघाताने माणसांच्या जंगलातून खऱ्याखुऱ्या जंगलात जातो. कोलकात्यातून थेट उत्तर बिहार इलाख्यातल्या जंगलात तो येतो. एका मोठ्या जमीनदाराच्या जंगलव्याप्त जमिनीचं व्यवस्थापन करण्यासाठी थेट पश्चिम बंगालच्या सीमेला येऊन भिडलेल्या या निबिड अरण्यात त्याला यावं लागतं. तिथल्या लोकांना भाडेतत्त्वावर वनजमिनींचे काही पट्टे शेतीसाठी द्यायचे, जंगलातून निर्माण होणाऱ्या काही उत्पादनांची शहरात विक्री करण्याची व्यवस्था लावायची अशी अनेक कामं असतात आणि हा श्रीमंत जमीनदार त्याला त्यासाठी मुखत्यार म्हणून नेमतो. सत्यचरण जेव्हा नोकरीच्या शोधात कोलकात्यात भटकत असतो तेव्हा त्याला तिथं भेटलेल्या अविनाश या त्याच्या एका श्रीमंत मित्रानेच हे काम त्याच्याकडे सोपवलं आहे. काम मोठं आहे, जंगलही थोडंथोडकं नाही तर तब्बल ३० हजार बिघे एवढी व्याप्ती असलेलं. हे काम जमीनदारीच्या धंद्यात मुरलेल्या लोकांकडे सोपवता येत नाही. कारण अशी माणसं खोटेनाटे धंदे करून फसवणारी असतात. शिकला-सवरलेला पण प्रामाणिक असाच माणूस या सर्व व्यवहारासाठी त्या जमीनदार कुटुंबाला हवा असतो. सत्यचरण हा तरुण नायक या कामासाठी त्यांना योग्य वाटतो. काम स्वीकारल्यानंतर तो जंगलात जातो. काही वर्षं तिथलाच होऊन राहतो. तिथल्या पानाफुलांशी, झाडांशी, वेलींशी त्याचं एक नातं निर्माण होऊ लागतं. जंगलातले सगळे बारकावे त्याला कळू लागतात. तिथल्या माणसांशी त्याचे भावसंबंध निर्माण होतात. जमिनीचा तुकडा आपल्याला वहितीसाठी मिळावा म्हणून दीनवाण्या नजरेने त्याच्या कार्यालयात येऊन बसणारे लोक जसे आहेत तसेच जंगलातल्या अद्भुत शिकारकथा आपल्या खास शैलीत त्याला सांगणारेही आहेत.
काही वर्षं या अरण्यात घालवल्यानंतर या कादंबरीचा हा नायक एक दिवस तिथून आपलं निहित कर्तव्य पार पाडून हा इलाखा सोडतो. त्या वेळी त्याला निरोप देण्यासाठी अनेक जण जमतात. हा असा काळ की ज्या काळात दळणवळणाची साधनं फारशी उपलब्ध नव्हती. तो या भागातून पालखीत बसून बाहेर पडतो. जरा उंच जागेवर आल्यानंतर नजर मागे वळवून पाहतो तेव्हा अरण्यातली मोठी मोठी झाडं कापून त्या ठिकाणी वसलेली काही घरं त्याला दिसू लागतात. गुरंढोरं, माणसांची वर्दळ, आरडाओरडा, हसणं-खिदळणं त्याला जाणवू लागतं. वहितीखाली आलेली शेतं दिसू लागतात. आपण आलो तेव्हा हा परिसर कसा निर्मनुष्य होता आणि आज कसा गजबजलेला आहे याची तुलना तो करू लागतो. दुरूनच या अरण्यप्रदेशाला तो मनोमन नमस्कार करतो. ‘अरण्यातील वनदेवतांनो, मला क्षमा करा, मी येतो’ असं म्हणत तो या ठिकाणाहून निरोप घेतो. बईहरच, लबटूलिया अशी गाव परिसराची नावं असलेला हा इलाखा, तेथील अरण्य आपल्याच हातून नष्ट झाले आहे याची खंत त्याच्या मनाला आहे. कादंबरीच्या सुरुवातीला लेखकाचे दोन पानी मनोगत आहे. या मनोगताच्या शेवटी एक कबुलीजबाब आहे. ‘अरण्य म्हणजे निसर्गाची एक स्वच्छंद अशी लीलाभूमी. ती माझ्या हातून नष्ट झाली. वनदेवता माझ्या या अपराधाबद्दल मला क्षमा करणार नाही. पण गुन्ह्याची कबुली आपल्याच तोंडाने दिल्याने अपराधाचे ओझे कमी होते असे मी ऐकले आहे.’ असा हा कबुलीजबाब लेखकाच्या मनोगतात आहे. जंगलातला निसर्ग नासवण्याचा, जंगलं निर्वस्त्र करण्याचा हा अपराधभाव केव्हाच अस्तंगत होऊन आता एक सर्वदूर असा निर्ढावलेपणा आलेला आहे.
आसाराम लोमटे (लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.)
aasaramlomte@gmail.com