‘हो, आहे माझ्याकडे तोच साप, जो साहेबांच्या अंगावरून गेल्यावर आठव्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले. गेली ६३ वर्षे निगुतीने सांभाळलेय मी त्याला- राज्य घडवणाऱ्या नेत्याच्या आयुष्यात सत्तेची पहाट उगवायला कारणीभूत ठरलेला म्हणून. अनेकदा सापाला घेऊन साहेबांना भेटायला गेलो पण एकदाही त्यांनी आत बोलावले नाही. साहाय्यकांमार्फत खूप प्रयत्न केले पण माझ्या पुरोगामी प्रतिमेला तडा जाईल असे सांगून त्यांनी प्रत्येक वेळी मला हाकलून लावले. या काळात साहेब मोठे झाले पण मी गारुडीच राहिलो. आता तुम्ही म्हणता त्यांच्या मुलीला मदत कर. अरे हट, करणार नाही म्हणजे नाही.’ भीमाशंकरमधील डिंभे विश्रामगृहाजवळच्या गावातील गारुड्याचे म्हणणे ऐकून त्याला घ्यायला आलेले सुप्रियाताईसमर्थक हैराण झाले.
साहेबांनी ताईंना हा प्रसंग सांगितल्यावर त्या तीनदा या विश्रामगृहात मुक्कामाला आल्या पण एकदाही साप त्यांच्या अंगावरून गेला नाही, असे समर्थकांनी सांगताच गारुडी हसला. ‘अरे, प्रत्येक साप भाग्यविधाता नसतो. एखादाच तसा असतो. या सहा दशकांत १२० वेळा कात टाकलेला हा तोच साप.’ हे ऐकून सारे विचारात पडले. मग लालूच, विनवणी सुरू झाली. जसा साहेबांचा भाग्योदय झाला तसा ताईंचा व्हावा अशी आमची इच्छा. अंगावरून गेलेला साप नक्की कुणाकडे तरी आहे, असे साहेबांनीच ताईंना सांगितले. शोधायचा प्रयत्न केला पण अपयश आले. अखेर ताईंनी सर्व पुरोगामी विचारवंतांची मनातून क्षमा मागत ही बाब सार्वजनिक केल्याबरोबर तुझा पत्ता सापडला. तेव्हा काहीही कर पण चल. तुझा अपमान होणार नाही. ऐकून गारुडी विचारात पडला. मग म्हणाला. ‘मी येतो सापाला घेऊन पण साहेबांना भेटणार नाही. त्यांच्यासमोर गेलो तर सापही चिडेल कारण त्याने माझे जगण्यातले हाल अनुभवले आहेत,’ हे ऐकून समर्थक खूश झाले. मग सारा लवाजमा बारामतीकडे निघाला. घरी पोहोचताच ताईंनी अचानक केलेल्या औक्षणामुळे गारुडी भारावला. नंतर बोलणी सुरू झाली.
याच घरात झोपलेले असताना साप अंगावरून गेला तर चालणार नाही का या ताईंच्या प्रश्नावर गारुडी नाही म्हणाला. ‘ती विश्रामगृहाची जागा दैवी आहे. तिथेच तो अंगावरून सळसळत जायला हवा व तेही तुम्ही गाढ झोपलेल्या असतानाच. तरच तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकाल.’ हे ऐकून ताई विचारात पडल्या. पटकन उठून त्या आत गेल्या तसा गारुडी बुचकाळ्यात पडला. एक समर्थक त्याच्या कानात कुजबुजला. ‘त्या साहेबांना विचारायला गेल्यात.’ थोड्याच वेळात बाहेर येत ताईंनी जाहीर केले. ‘चला डिंभे विश्रामगृहात’ मग सारे भीमाशंकरकडे रवाना झाले. रात्री झोपण्याच्या आधी ताईंनी एकदा सापाला बघू द्या अशी विनंती केली. गारुड्याने पेटारा उघडताच साप फणा काढून ताईंच्या दिशेने झेपावू लागला तशी त्यांची भीतीने गाळण उडाली. पद हवे असेल तर जोखीम घ्यावीच लागेल असे मनाला समजावत त्या शांत झाल्या. काहीही दगाफटका होऊ नये म्हणून गारुडी व एका समर्थकाने शयनकक्षात जागत राहावे असे सांगून त्या झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या पण त्यांना झोप येईचना. इकडे पेटाऱ्यातून बाहेर आलेल्या सापाने दोनदा पलंगावर चढण्याचा प्रयत्न केला पण ताईंची चुळबूळ बघून तो खाली उतरला. यात अख्खी रात्र गेली पण साप अंगावरून गेला नाही. सकाळी चिडलेल्या ताईंनी आधी गारुड्याला विश्रामगृहाबाहेर काढले. निराश होऊन तो परतत असतानाच अजितदादांच्या समर्थकांनी त्याला घेरले व पुन्हा पुण्याकडे घेऊन गेले.