तिकडे इस्रायलमध्ये बिन्यामिन नेतान्याहू यांचे सरकार न्यायपालिकेवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करीत असताना इकडे कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी न्यायाधीश नेमणुका करणाऱ्या व्यवस्थेत सरकारी प्रतिनिधीही असावा अशी ‘सूचना’ करावी हा योगायोग खचितच सूचक म्हणायचा. रिजिजू यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांस पत्र लिहून अशी ‘सूचना’ केली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, त्याआधी खुद्द कायदामंत्री रिजिजू अशांनी सरकार काय करू इच्छिते त्याबाबत वातावरणनिर्मिती केलेली आहेच. न्यायपालिकेस इतके स्वातंत्र्य नको हे या सर्वाच्या म्हणण्याचे सार. ते त्यांनी वेगवेगळय़ा शब्दांत आणि वेगवेगळय़ा निमित्ताने व्यक्त केले. तेव्हा यातून सरकारला नक्की काय हवे आहे हे दिसत होतेच. ‘लोकशाहीत बहुमती सरकार हेच काय ते सर्वोच्च समर्थ. त्यास न्यायपालिका आडवी येऊ शकत नाही’- या अर्थाची ही मांडणी गेले काही दिवस सुरू आहे. तिचा पुढचा टप्पा म्हणजे रिजिजू यांचे हे पत्र. रिजिजू यांच्या ताज्या पत्राचा समाचार घेण्याआधी न्यायपालिका आणि सरकार यांतील संघर्षांबाबत ‘लोकसत्ता’ने अलीकडे लिहिलेल्या दोन संपादकीयांचा दाखला देणे उचित ठरावे. ‘मतांच्या मर्यादा’ (१४ नोव्हेंबर) आणि ‘पंगू प्रजासत्ताक’ (१९ डिसेंबर) या दोन संपादकीयांतून आतापर्यंतच्या घटनांवर भाष्य केले गेले. त्यानंतर आता कायदामंत्र्यांचे हे पत्र.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या पत्रात कायदामंत्री उच्च व सर्वोच्च न्यायालयांतील न्यायाधीश नेमणुकीच्या प्रक्रियेत- म्हणजे पर्यायाने न्यायवृंदात – सरकारी प्रतिनिधीस ‘सामावून’ घ्या अशा प्रकारची सूचना करतात. प्रचलित पद्धतीत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नेमणुका न्यायवृंदामार्फत केल्या जातात. ही व्यवस्था दुहेरी आहे. सरन्यायाधीश नेतृत्व करतात त्या न्यायवृंदात ज्येष्ठ न्यायाधीश असतात तर उच्च न्यायालयातील नेमणुकांबाबत उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायवृंदाकडून भारताच्या सरन्यायाधीशांकडे शिफारस केली जाते. मग सर्वोच्च न्यायालयातील न्यायवृंद केंद्रीय कायदा खात्यास शिफारस करतो. ही पद्धत अशीच सहजच विकसित झालेली नाही. तीस तीन विविध न्यायालयीन लढायांची पार्श्वभूमी आहे. आधी १९८१ सालच्या ‘फस्र्ट जज केस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या खटल्याच्या निकालात याचा उगम. या निकालात प्रशासनास न्यायाधीश नियुक्तीत अधिक अधिकार हवा, असा निर्णय दिला गेला. त्यानंतर एक तपाने १९९३ साली सर्वोच्च न्यायालयाने ही पद्धत बदलून सरन्याधीशांस न्यायाधीश नेमणुकांत अधिक अधिकार देण्याचा निर्णय घेतला. आणखी पाच वर्षांनी १९९८ साली ‘थर्ड जज केस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकरणात यावर शिक्कामोर्तब झाले आणि न्यायवृंद पद्धती अस्तित्वात आली. तेव्हापासून देशातील उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांतील न्यायाधीश नेमणुका या न्यायवृंदामार्फत केल्या जातात. ही पद्धत निर्दोष नाही, हे सर्वास मान्य असलेले मत. अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या न्यायाधीश नियुक्त्यांवर टीका होतेच. न्यायवृंद पारदर्शी नसतो अशी यातील महत्त्वाची टीका. ती अस्थानी नाही. तेव्हा या पद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे, हेदेखील तितकेच सर्वमान्य निरीक्षण.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Law minister kiren rijiju want government nominees in court collegiums amy
First published on: 18-01-2023 at 02:23 IST