विंग कमाण्डर विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त)
‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायझेशन’ (डीआरडीओ), भारत ‘इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ (बीईएल), ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ (इस्रो) आणि भारतीय सशस्त्र सैन्यदले यांनी मिळून आत्मनिर्भर, अत्याधुनिक आणि स्वतंत्र आकाश-तीर एक “रियल-टाईम टारगेटिंग आणि इंटरसेप्शन सिस्टिम” तयार केली आहे. भारताच्या या यंत्रणेने आधुनिक युद्धाचे तंत्रच बदलून टाकले आहे. इस्रोच्या उपग्रहांचे जाळे, भारतीय-जीपीएस नाविकचे अचूक मार्गदर्शन आणि स्वतंत्र स्टेल्थ (शत्रूच्या रडार्सना अदृश्य असलेल्या) ड्रोन्स (ऑटोनॉमस स्टेल्थ ड्रोन्स) यांच्यावर आधारित, आकाश-तीरने आधुनिक युद्ध-तंत्रामध्ये जबरदस्त सुधारणा तर केलीच, शिवाय ‘ऑपरेशन-सिंदूर’ मध्ये भारताला लक्षणीय यश प्राप्त करून दिले.

आकाश-तीर मिसाईल प्रक्षेपित करताना

कारगिल युद्धावेळी, अमेरिकेने उपग्रहांचे जीपीएस सिग्नल्स बंद केले. त्यामुळे भारतीय सशस्त्र सेनादलांना ते युद्ध जीपीएसशिवाय लढावे लागले होते. त्या अनुभवातून भारताने धडा घेतला. २०१४ नंतर संशोधनाला गती मिळून, भारताने इस्रोद्वारे अवकाशात स्वतःच्या उपग्रहांचे स्वतंत्र जाळे निर्माण केले आणि त्यावर आधारित आत्मनिर्भर भारतीय-जीपीएस प्रणाली, नाविक निर्माण केली. अमेरिका आणि रशियाच्या उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज जगात सर्वांना माहीत आहेत. मात्र भारतीय उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सी गुप्त असून, त्या हव्या तेव्हा बदलण्याची सोयही आहे. नाविकची अचूक नेव्हिगेशन (मार्गदर्शन) पद्धती आकाश-तीरच्या स्टेल्थ-ड्रोन्सना त्यांच्या लक्ष्यापर्यंत १५ सेंटिमीटर्सच्या अचूकतेने पोहोचविते.

इस्रायलचे आयर्न-डोम आणि बराक, चिनी एचक्यू-९, तसेच अमेरिकेची इंटिग्रेटेड एअर कमाण्ड आणि मिसाईल डिफेन्स बॅटल कमाण्ड सिस्टिम यांना तुल्यबळ, भारताचा आकाश-तीर आहे. नाटोचा सदस्य नसलेल्या, एका प्रगतीशील पौर्वात्य देशाने प्रथमच पूर्णतः देशी बनावटीची उपग्रह-नेव्हिगेशन पद्धती विकसित केली आहे. ही पद्धत एआय वापरणारी, स्वयंपूर्ण, बदलणाऱ्या युद्धस्थितीवर मात करू शकणारी आणि अकाशावर प्रभुत्व ठेवणारी आहे.

आकाश-तीर काय आहे?

भारतीय सेनेच्या वायू-रक्षा पद्धतीतील आणि भारतीय वायुसेनेच्या इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कन्ट्रोल सिस्टिम (आयएसीसीएस)चा भाग असलेली आकाश-तीर ही विविध-स्तरांवर कार्य करणारी, स्वसंरक्षण करून शत्रुराष्ट्राच्या शस्त्रास्त्रांना निकामी करू शकणारी स्वयंचालित अमोघ शक्ति असून, ती पुढील तत्वे वापरते:

(१) पृथ्वीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी इस्रोने विकसित केलेल्या उपग्रहांनी पाठवलेली ताजी चित्रे.

(२) भारतात विकसित केलेल्या, नाविक- जीपीएस- सिस्टिमने तयार केलेल्या, अचूक नकाशांच्या साहाय्याने लक्ष्यभेद.

(३) स्वयंचालित ड्रोन्स (५-१० किलोग्रॅम वजनाचा दारूगोळा असलेले, वेगवान, लांब-पल्ल्याचे रडारला न दिसणाऱ्या (स्टेल्थ) डिझाईनचे आणि थव्याप्रमाणे रचना करू शकणारे) आणि मिसाईल्स.

(४) एआय वापरून स्वतः त्वरित निर्णय घेऊ शकणारी, भारतीय बनावटीची कमाण्ड-ग्रिड सिस्टिम.

(५) बीईएलने आखलेल्या रणांगणाचा चपखल आढावा घेणारी, युद्धक्षेत्रामध्ये कोठेही वापरण्याजोगी (फील्ड-डिप्लॉएबल) कंट्रोल-सेंटर्स असलेली, सुरक्षित संपर्क-प्रणाली.

(६) आकाश-तीर हे एक अस्त्र किंवा ड्रोन नाही, तर ही अनेक युद्धप्रणाली (उपग्रह, ड्रोन्स, जमिनीवरील रडार्स, चल-युद्ध-केन्द्रे) एकत्र करून, एआय-प्रोसेसर्स वापरून, आकाशातून स्वत:हून हल्ला करू शकणारी संरक्षक शक्ति आहे.

(७) आकाश-तीरचे एकात्मिक सेन्सर्स – त्रिमीत टॅक्टिकल रडार्स, कमी-उंचीवरील लक्ष्य ओळखू शकणारी हलकी रडार्स आणि आकाश शस्त्र-प्रणाली, ही वैशिष्ट्ये आहेत.

इस्रोचे उपग्रह रणांगणावर सतत सर्वत्र नजर ठेवतात. पारंपरिक पद्धतीमध्ये लक्ष्यासंबंधीची माहिती त्यावर काही कृती करेपर्यंत जुनी होते. इस्रोच्या CARTOSAT आणि RISAT या उपग्रह-प्रणालींतून आलेली त्या क्षणाची माहिती वापरल्याने आकाश-तीरला पृथ्वीतलानुसार सद्यस्थितीतील लक्ष्यावर त्वरित हल्ला करता येतो. विदेशी उपग्रहांपेक्षा, स्वदेशी उपग्रह जास्त कार्यक्षम ठरले आहेत.

नाविक- जमीन डोंगराळ असो किंवा वाळवंट असो, कमाल-अचूकता देणारा भारताच्या स्वतःच्या उपग्रहांचा संच आहे. दक्षिण-आशियामध्ये तो पाश्चात्य-जीपीएसपेक्षा जास्त विश्वसनीय आहे. शिवाय स्थानिक नाविक-मार्गदर्शक-प्रणाली अमेरिकेच्या किंवा चिनी जीपीएस-मार्गदर्शक प्रणालीपेक्षा जास्त प्रभावी ठरते.

आकाश-तीरच्या प्रत्येक ड्रोनचे वैशिष्ट्य असे की ते पाच ते दहा किलोग्रॅम्स शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकतात. जमिनीपासून कमी उंचीवरून उडतात आणि रडार्सना न दिसण्याचे तंत्र वापरू शकतात. ऐनवेळी लक्ष्यांमध्ये बदल केले तरी, स्वत: मार्ग काढू शकतात. पारंपरिक चिनी आणि पाकिस्तानी रडार्सना हे ड्रोन दिसू शकत नाहीत. प्रत्येक ड्रोनची रचना युद्धातील कामिकाझे हल्ल्यासाठी केलेली आहे. प्रत्येक ड्रोन शत्रूला चाहूल लागू न देता, टेहळणी आणि मारा करून, दिलेले लक्ष्य नष्ट करू शकतो.

आकाश-तीर चे C41SR

एआय आणि स्वार्म कॉम्बॅट तंत्र वापरल्यामुळे विलंब होत नाही. कॉम्बॅट क्लाउड त्याच्या प्रक्रियेसाठी पुढील तंत्रांचा वापर करतो- शत्रूच्या रडार्सचे सिग्नल्स, जमिनीवरील वाहनांच्या हालचाली, हवामान आणि जमिनीची उंच-सखलता जाणून घेणे इत्यादी. प्रत्यक्ष युद्धात होणारे बदल त्वरित विचारात घेऊन, आकाश-तीर नवी लक्ष्ये ठरवून, त्यांवर मिसाईल किंवा ड्रोन पाठवून, त्यांना नव्या सूचना देऊन, बदललेल्या मार्गावर काही सेकंदांत पाठवू शकतो. नाटो आणि चिनच्या पारंपरिक मानवी-कमाण्ड पद्धतींच्या तुलनेमध्ये आकाश-तीरची ही शून्य विलंब प्रक्रिया प्रचंड सुधारित आहे.

तुर्कीच्या ड्रोन प्रभुत्वाला धक्का

तुर्कीचे “बैरक्तार” (टीबी-२) अनमॅन्ड एरियल व्हेईकल्स ड्रोन्स अझरबैजान आणि आर्मेनियात २०२० मध्ये झालेल्या नागोरनो-काराबाख युद्धामध्ये वापरण्यात आले होते. टीबी-२ वर तुर्कीच्या रोकेस्तान कंपनीचे लेझर-गायडेड बॉम्ब्स बसवण्यात आले होते. त्यांचा अझरबैजानला फायदा झाला आणि त्यांनी ते युद्ध जिंकले. त्यामुळे संरक्षण-सामुग्री पुरवणाऱ्या राष्ट्रांमध्ये तुर्कीचे स्थान उंचावले होते. तुर्कीने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरपूर्वीच शेकडो “बैरक्तार” टी-२ पुरवले होते, मात्र “बैरक्तार”च्या तुलनेमध्ये आकाश-तीर कमी वजनाची, जास्त स्टेल्थ असणारी, जास्त स्वतंत्र आणि म्हणूनच श्रेष्ठ सिस्टिम असल्याचे स्पष्ट झाले.

चीनने बसवून दिलेली पाकिस्तानी वायू-रक्षा प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टिम) आकाश-तीरपुढे टिकू शकली नाही. आकाश-तीरच्या फ्रिक्वेन्सीज पकडू न शकल्यामुळे, अमेरिकाने पुरवलेली “अर्ली वॉर्निंग अँड कन्ट्रोल सिस्टिम” तसेच अँटी-ड्रोन रडार्स पूर्णतः निकामी ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विंग कमाण्डर विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त)