अभ्यासाच्या प्रक्रियेत जर प्रयत्नांपेक्षा अपेक्षांना महत्व जास्त असेल तर गडबड आहे. अभ्यासूवृत्ती चांगलीच, पण पालक, शिक्षक, परीक्षा, गुण आणि निकाल या पंचमहाभूतांच्या भीतीने अभ्यास चिंतेचा विषय होऊ लागला आहे. परिणामी आजच्या परीक्षा पद्धतीत घासू आणि अभ्यासू असे दोन प्रकारचे विद्यार्थी दिसतात. या विद्यार्थ्यांतील महत्वाचा फरक म्हणजे घासू अपेक्षेपाठी धावत असल्याने त्याला अपेक्षाभंगाचे वैफल्य येऊ शकते. अभ्यासूला मात्र कुतूहलाचे आकर्षण असल्याने त्याचा अभ्यास आनंददायी होतो.
आपल्या आजच्या समाजात आभ्यासाकडे बघायची प्रक्रिया ‘मार्क्सिस्ट’ आहे. आणि म्हणूनच ती घासूवृत्तीला प्रोत्साहित करणारी आहे. म्हणून जेवढ्या आनंदाने आपण मुलांचा निकाल न्याहाळतो, तेवढ्या कौतुकाने मुलाचे प्रयत्न न्याहाळताना दिसत नाही. पाठ्यपुस्तकाबाहेरचे वाचन करणे म्हणजे फालतू वेळ दवडणे, असे समजण्याचा हा काळ आहे. मग घरात छोट्यामोठ्या गोष्टींसाठी कितीवेळा शास्त्रशुद्ध उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो? का, केव्हा, कुठे, कसा आणि कधी या शब्दांचा विद्यार्थी आणि पालकांच्या मनात किती वावर आहे? प्रयोगशीलता आणि नवविचार यांना किती मान आहे? असे प्रश्न पडणे दूरच. या सर्वच प्रश्नात समाजात गुणवत्तेविषयीच्या धारणेची कारणे दडलेली आहेत. आभ्यासाचे भूत चांगले असले तरी अपेक्षांचे भूत उतरवणे गरजेचे आहे. अभ्यासावर श्रद्धा असली तरी पाठ्यपुस्तकावर अंधश्रद्धा मात्र नको.
म्हणून आजच्या पालकांनी मनापासून समजून घ्यायला हवे की, हल्ली दहावी, बारावीच्या मुलांची जी टक्केवारी वाढलेली दिसते, ती बाळसं आहे की सूज? ‘असर’ संस्थेने केलेल्या अभ्यासातून आपल्या लक्षात येते की, आठवी, नववीच्या बहुसंख्य मुलांना ‘श्वासोच्छ्वास’ हा शब्द लिहीता येत नाही. तसेच बेरीज-वजाबाकी, गुणाकार करताना गोंधळ उडतो आणि इंग्रजी भाषेतील स्पेलिंगच्या चुका तर विचारूच नाका! एवढ्या कमतरता असूनही दहावीत मात्र त्यांना ८०-९० टक्क्यां पर्यंत गुण मिळतात आणि शाळांचा निकाल १०० टक्के लागतो. हे कसे काय शक्य होते, याचा जरा खोलवर धांडोळा घेतला तर आपल्याला काय दिसते?
हल्ली ८० गुणांचा लेखी पेपर असतो आणि २० गुण अंतर्गत तपासणीसाठी असतात. अंतर्गत तपासणी म्हणजे विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या, प्रयोग वह्या, तोंडी परीक्षा, प्रोजेक्ट वह्या इत्यादी. हे २० गुण शालेय शिक्षकच देतात. आपल्या शाळेचा १०वीचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून सगळ्या शाळांमधून अंतर्गत तपासणीचे गुण पैकीच्या पैकी म्हणजे २० पैकी २० असे सढळपणे दिले जातात. परीणामी मुलाला लेखी परीक्षेत ८० पैकी पाच गुण जरी मिळाले तरी तो मुलगा उत्तीर्ण होतो. आश्चर्य वाटले ना! कसे ते पहा : ५ गुण लेखी परीक्षेचे २० अंतर्गत तपासणीचे १५ ग्रेस गुणांपैकी १० गुण एका विषयात देता येतात. म्हणजे २५ अधिक १० म्हणजे ३५. झाले की नाही मूल पास! अशाप्रकारे निकाल उत्तम लागल्यावर टक्केवारी वाढणारच! मग साधारण मुलांनाही थोड्याशा पाठांतराने ८०-९० टक्के गुण मिळाल्यास नवल वाटू नये.
विचार करायला लावण्यासारखे प्रश्न परीक्षेतून हद्दपार केल्याने पुढे स्पर्धात्मक परीक्षा देणे या विद्यार्थ्यांना कठीण जाते. कॉमर्स विभागातील सनदी लेखापाल (सीए), कंपनी सेक्रेटरी (सीएस), कॉस्ट अकाऊंटिंग या परीक्षेत फक्त पास होण्यासाठी किमान ५० टक्के गुण मिळवावे लागतात व त्यासाठी विद्यार्थ्यांना खूप झगडावे लागते. त्याचप्रमाणे साईटी, जेईई या परीक्षेत दहावीला ९०-१०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी पार ३५-४० टक्क्यांपर्यंत खाली घसरतात. याचे कारण आपल्या ‘घोका आणि ओका’ या परीक्षा पद्धतीत आहे. तेव्हा व्यावसायिक परीक्षेला बसण्यासाठीची मानसिकता लहानपणापासून तयार करून घ्यायची असेल तर लहानपणापासूनच विचार करणाऱ्या परीक्षा देण्याची सवय विद्यार्थ्यांना लावणे गरजेचे आहे. आज गुणांना आणि पदव्यांना कोणतीही किंमत उरलेली नाही… किंमत आहे ती कलेला आणि कौशल्यांना; पण कौशल्ये आणि कला या केवळ अनुत्तीर्णासाठीच आहेत असा गोड गैरसमज श्रमाला प्रतिष्ठा नसल्यामुळे आपल्या समाजात वाढला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीत मिळालेल्या भरगच्च गुणांनी काय साधते याचा विचार विद्यार्थ्यांसह पालकांनीही करायला हवा.
मुलांची गुणवत्ता त्यांच्या गुणांवर न जोखता त्यांची प्रश्नाला सामोरे जाण्याची कुवत, आकलन क्षमता आणि शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याची वृत्ती किती वाढली आहे यावर ठरविली जाणे गरजेचे आहे. भविष्यात आपले मूल स्पर्धेत कितपत टिकाव धरू शकेल याचा विचार करा. कारण स्पर्धेत टिकण्यासाठी चिकित्सक वृती आणि चौकस बुद्धी वाढणे महत्वाचे आहे. म्हणून परीक्षेतील गुण म्हणजेच आपल्या पाल्याची गुणवत्ता असे समजण्याची चूक आपण कधीही करू नये. अन्यथा आयआयटी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, सीए यासारख्या उच्च शिक्षण घेण्याच्या दबावापोटी आपला पाल्य नैराश्याच्या गर्तेत जाईल आणि आपण दुःखात बुडून जाऊ. तेव्हा विद्यार्थ्यांना आपल्या प्रतिष्ठेचे साधन न मानता त्यांच्या कुवतीप्रमाणे शिक्षण घ्यायची मुभा आजच्या पालकांनी द्यायला हवी. तेव्हा कमी गुण मिळालेल्या मुलांना कमी लेखू नका.
विद्यार्थ्यांनीही ‘मी महत्त्वाचा आहे,’ असे जगाला ठणकावून सांगितले पाहिजे. अथक प्रयात्नांना अपेक्षेप्रमाणे यश आले नाही, जर योजलेल्या गोष्टींच्या विपरीत घटना घडत राहिल्या किंवा सतत अपयशाशी सामना होत राहीला तर कदाचित निराशा तुम्हाला ग्रासू लागेल. अपयशाशी सामना करणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे, मात्र जे अपयशाला तेवढ्याच ताकदीने सामोरे जातात तेच पुढे खंबीर बनतात. अपयशाचे दु:ख करत बसण्यापेक्षा ‘यातून मी काय शिकलो?’ हा प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे.कोणतीच नवीन गोष्ट सहज सोपी नसते. तसेच गुणवत्ता आणि मेहनतीचे फळ लवकर मिळतेच असे नाही. त्यासाठी कधीकधी बराच काळ जावा लागतो. सुचलेली एखादी कल्पना आणि तिला मूर्त स्वरूप देण्यासाठी केलेले काम उज्ज्वल भविष्य घडवू शकते. प्रत्येक प्रयत्नाला यश मिळालंच पाहिजे हा अट्टहास करू नये. हवे ते साध्य होईपर्यंत कठोर प्रयत्न करावेत.
jetjagdish@gmail.com