पद्माकर गंगाधर कांबळे

दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील राजेंद्र पाल गौतम यांनी राजीनामा दिला. एरवी दिल्लीतील कुणा अपरिचित मंत्र्याने राजीनामा देणे, ही बातमी महाराष्ट्रात चर्चिली जात नाही, परंतु गौतम यांच्या राजीनाम्याची बातमी ‘लोकसत्ता’सह अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी (११ ऑक्टोबर रोजी) दिली. या बातमीची चर्चा समाजमाध्यमांतूनही झाली. ही बातमी वरकरणी फार सनसनाटी वाटावी अशी असल्याचे चित्र समाजमाध्यमांतून दिसले.

दसऱ्याच्याच दिवशी, ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’चे आयोजनही देशभर केले जाते. बातमीनुसार, नवी दिल्लीत दसऱ्याच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात शेकडो जणांनी बौद्ध धर्माची (धम्माची) दीक्षा घेतली! त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत, हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचा आरोप भाजपने केला आहे! भाजपने सांगितलेले यामागील कारण असे की, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या त्या कार्यक्रमात, बौद्ध धर्म स्वीकारलेल्या लोकांनी आपण हिंदू देवदेवतांना मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही अशी ‘प्रतिज्ञा’ केली!

हेही वाचा… पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

मुळातच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्यांना, डॉ. आंबेडकर यांच्या विचारातून साकारलेल्या ‘प्रतिज्ञा’ घ्यावाच लागतात! १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात झालेल्या दीक्षा समारंभात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेणाऱ्या पाच लाख अनुयायांना २२ प्रतिज्ञा घ्यावयास सांगितले. तोही प्रकार तेव्हा (१९५६) अभिनव आणि सर्वस्वी नवीन होता! डॉ. आंबेडकरप्रणीत धम्माला ‘नवयान’ म्हटले गेले, त्यामागे या २२ प्रतिज्ञांचा अभिनव प्रयोग हेही महत्त्वाचे कारण होते.

राजेंद्र पाल गौतम उपस्थित असलेल्या धम्मदीक्षा सोहळ्यात साहजिकच, बौद्ध धर्म स्वीकारलेल्या लोकांनी या २२ प्रतिज्ञांचा सामूहिक जाहीर उच्चार केला असणारच! या २२ प्रतिज्ञांपैकी प्रतिज्ञा क्रमांक १ ते ८ या उघडपणे ‘हिंदू देवदेवता-प्रार्थना-उपासना पद्धती नाकारणाऱ्या’ तसेच ‘बौध्द धर्माच्या विसंगत आचरण करण्यास मनाई करणाऱ्या’ आहेत उदाहरणार्थ, “(१) मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. (२) मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. (३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. (४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.” किंवा “(६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.” असा या प्रतिज्ञांचा आशय आहे आणि प्रतिज्ञा क्रमांक १९ ‘हिंदू धर्माचा’ (व्यक्तिगत पातळीवर) निषेध करणारी आहे! या २२ प्रतिज्ञांचा हिंदी व इंग्रजी कायमस्वरूपी फलक (काळ्या संगमरवरी लाद्यांवर कोरलेल्या स्वरूपात) शिलालेखासारखा नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरात विराजमान आहे. गेल्या साडेसहा दशकांत अनेकांनी या प्रतिज्ञांचा जाहीर उच्चार आपापल्या दीक्षा-समारंभात केलेला आहे.

हेही वाचा… संघाच्या विरोधात मोर्चा काढणारे वामन मेश्राम आहेत कोण?

मात्र राजेंद्र पाल गौतम यांच्याविषयी वाद उभा केला गेल्यानंतर, त्यांनी राजीनामा देणे पसंत केले. अशा वेळी भाजप आणि आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षांतील नेते गप्प होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वाद’ जर या ‘प्रतिज्ञां’वरून झाला असेल तर, नुकत्याच पार पडलेल्या ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या नागपूर दीक्षाभूमी येथील मुख्य सोहळ्यात, प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञांच्या उजळणीची गरज’ प्रतिपादन केल्याचे वृत्त नागपूर-पुणे- मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाने (‘लोकसत्ता’ नव्हे) दिले आहे! भाजपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना दीक्षाभूमीवरील जनसमुदायापुढे बोलताना ‘हिंदू देवदेवतांची- प्रार्थना- उपासना नाकारणाऱ्या आणि हिंदू धर्माचा निषेध करणाऱ्या’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘२२ प्रतिज्ञांच्या उजळणीची गरज’ जर वाटत असेल, तर दिल्लीतील भाजपला त्या, ‘हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या’ का वाटतात?