सीए अनिलकुमार शाह
आमच्याकडे एक एम. कॉम. झालेला विद्यार्थी काम शिकण्यासाठी म्हणून आला होता. तो जळगावी नवीनच आला असल्याने त्याचे बँकेत खाते नव्हते. त्यामुळे त्याला पगारापोटी बेअरर चेक दिला. १५ दिवस होऊन गेले तरी चेक वटला नाही व महिना अखेरीस न वटलेला म्हणून दिसत होता. तेव्हा त्याला विचारले असता, “बँकेतून पैसे कसे काढायचे ते मला माहीत नाही” हे त्याचे उत्तर! विचार करा एम. कॉम. झालेल्या विद्यार्थ्याची ही दशा आहे.

जग व खासकरून व्यापार क्षेत्र गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलले. त्यात जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाल्याने उद्योग धंद्यात जमाखर्च ठेवण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाले व व्यापाऱ्यांना आता जमाखर्च रोजचे रोज अद्ययावत करून दरमहा विवरणपत्र भरणे गरजेचे झाले आहे. शिवाय व्यापारात ऑनलाईन व्यवहार खूप वाढले आहेत. विविध व्यापाऱ्यांशी, आयकर व जीएसटी विभागांचे सर्व पत्रव्यवहार ईमेलद्वारे किंवा त्या त्या विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून होतात. म्हणजे संगणक व इंटरनेटचा वापर नित्याचा व अविभाज्य झाला आहे.

loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
Why is mobbing experienced again and again in universities
विद्यापीठांमध्ये पुन्हा पुन्हा झुंडशाही का अनुभवाला येते आहे?
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?

कोणत्याही व्यापाऱ्याची वाणिज्य शाखेच्या पदवीधराकडून अपेक्षा असते की त्याला रोजचे बँकेचे व्यवहार करता आले पाहिजेत. संगणकावर आयकर व जीएसटीसाठी आवश्यक ते जमाखर्च योग्य पद्धतीने ठेवता आले पाहिजेत आणि प्राथमिक किंवा जुजबी तरी पत्रव्यवहार करता आला पाहिजे, पण विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम अनेक वर्षांपूर्वी जेथे होता तिथेच आहे. परिणामी व्यापार उद्योग क्षेत्रात पुरेसे ज्ञान असलेल्या वाणिज्य पदवीधरांची उणीव नेहमी भासते. ज्याला जमाखर्चाचे, आयकर व जीएसटीसाठीचे प्राथमिक काम करता येईल असे वाणिज्य पदवीधर उपलब्ध नाहीत.

हेही वाचा : ही रुजविलेली अन्यायग्रस्तता तर नव्हे?

विद्यापीठ आणि महाविद्यालयांकडून याबाबत काहीच पावले उचलली जात नाहीत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. फक्त वाणिज्यच नव्हे तर कोणत्याही शाखेसाठी संगणक प्रशिक्षण तर आता सक्तीचेच केले पाहिजे इतकी ती बाब आवश्यक झाली आहे. पण तसे होताना दिसत नाही. विद्यार्थ्यांना आजही संगणक प्रशिक्षण महाविद्यालयांत नव्हे तर खासगी शिकवणीत जाऊन घ्यावे लागते. बँकेचे व्यवहार कुणालाही येणे गरजेचे आहे. त्याबाबत कोणतीही सुधारणा अभ्यासक्रमात झालेली नाही.

वाणिज्य शाखेत याविषयी प्रत्यक्ष कार्यानुभव सक्तीचा केला पाहिजे. आज विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जमाखर्चाची वह्या-पुस्तके हातात दिली तर त्यातले कोणते काय आहे हे सुद्धा सांगता येत नाही. ताळेबंद कसा बनवितात या सध्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येत नाही, इतकी परिस्थिती वाईट आहे. कोणत्याही खासगी व सरकारी आस्थापनेत जमाखर्चाच्या कामासाठी वर सांगितलेली अगदी प्राथमिक कामे येणारे कर्मचारी शोधणे जिकीरीचे झाले आहे. त्यांची तोंडी परीक्षा किंवा मुलाखत घेतानाचे अनुभव फार निराशाजनक आहेत. यामुळेच वाणिज्य शाखेच्या पदवीधरांची संख्या मोठी आहे, त्यांच्यासाठी उपलब्ध संधी आणि नोकरीसाठी रिकाम्या जागाही भरपूर आहेत, तरीही या शाखेच्या पदवीधरांना नोकरी मिळवण्यात अडथळे येतात, मनासारखी नोकरी मिळत नाही आणि कंपन्यांना कर्मचारी मिळत नाहीत, मिळतात त्यांचा दर्जा अपेक्षेप्रमाणे नसतो, असा साराच विरोधाभास आहे. जागा असून त्यांना काम मिळत नाही, कारण प्रत्यक्ष काम त्यांना येतच नसते, कारण त्यांना ते कधी योग्य पद्धतीने शिकविलेलेच नसते.

हेही वाचा : आपण सावित्रीबाईंचा वसा पुढे नेणार का?

काय करता येईल?

यासाठी साधे सोपे उपाय आहेत. वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम हा प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाशी निगडीत असणे गरजेचे आहे. व्यावहारित जग बदलत असताना त्या-त्या टप्प्यांवर आणि तेवढ्याच वेगाने अभ्यासक्रमातही आवश्यक ते बदल केले गेले पाहिजेत. आहे त्या अभ्यासक्रमात संगणक वापरणे, जमाखर्चाच्या सॉफ्टवेअर वापराचे प्रशिक्षण, आयकर व जीएसटी यांची निदान प्राथमिक माहिती अकरावीपासूनच टप्प्या टप्प्याने अंतर्भूत करावी लागेल. यासाठी सनदी लेखापालांच्या राष्ट्रीय संस्थेचे सहाय्य अगदी विनामूल्य उपलब्ध होऊ शकते. हे सर्व करणे अजिबात क्लिष्ट वा कठीण नाही. फक्त थोडी इच्छाशक्ती हवी. नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतील.

हेही वाचा : धार्मिक उत्सव जरूर असावेत… पण त्यात सरकार कसे सहभागी होऊ शकते?

अभ्यासक्रमात हे बदल करत असताना प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठीही पाऊले उचलली जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सनदी लेखापालांकडे किमान तीन वर्षे प्रत्यक्ष काम करणे सक्तीचे केले पाहिजे. तसे झाल्यास या प्रशिक्षणाचा उत्तम परिणाम सर्वदूर दिसून येईल. वाणिज्य शाखेची पदवी घेताच नोकरी मिळविणे सहज शक्य होईल. विद्यापीठांना अगदी नोकरीचे मेळावे आयोजित करूनही नोकरी मिळवून देता येईल, इतकी आज वाणिज्य शाखेच्या पदवीधरांना मागणी आहे. अर्थात प्रस्थापित व्यवस्थेतील अडथळ्यांकडे दुर्लक्ष करून थोडे धाडस दाखवीत योग्य पावले उचलली तर येणाऱ्या पिढ्या बेरोजगारीचे लेबल लावून फिरताना दिसणार नाहीत. याचा आणखी एक सकारात्मक परिणाम असा असेल, की रिकामी टाळकी कमी झाल्यामुळे समाजात सुद्धा उत्तम बदल होतील, देशाच्या प्रगतीला हातभार लागेल.

caanilshah@gmail.com